नगर परिषदेनंतरही समस्या सुटेना : वडगाव येथील प्रभाग १ व ३ मध्ये दिवसाआड पाणीपुरवठाचिमूर : सूर्य आग ओकत असल्याने जीवाची लाही लाही होत आहे. पारा वाढल्याने जमीनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने चिमूर नगर परिषद हद्दीतील गावात पाण्याचे संकट उग्र रूप धारण करू लागले आहे. या संकटावर मात करण्याच्या दृष्टीन ग्रामपंचायत असताना ग्रामीण पाीण पुरवठा विभागामार्फत वडाळा, शेडेगाव, सोनेगाव व काग गावात विस्तारीत नवीन नळ योजनेचे कामे करण्यात आले. मात्र १ मे २०१५ ला चिमूर नगर परिषद अस्तीत्वात आल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत असलेले कामे बंद केली. ही योजना नगर परिषदेकडे अजून हस्तांतरित न झाल्याने या गावातील नळयोजना रखडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.चिमूर शहरापासून हाकेवर असलेल्या वडाळा, शेडेगाव, सोनेगाव व काग गावात ग्रामपंचायत अस्तीत्वात असताना ग्रामीण पाणीे पुरवठा विभागाच्या मार्फत नळ योजना मंजूर करण्यात आल्या. त्यामध्ये वडाळा (पैकु) येथील नळ योजनेची पाईप लाईन टाकायची आहे. तर पंप हाऊस तयार झाले नाही. शेडेगावात पंपहाऊसचे काम करणे बाकी आहे. सोनेगाव (खियम) येथील काम पूर्ण झाले असून हस्तांतरण करण्यात आले नाही. तसेच काग गावात नवीन नळ योजनेचे काम मंजूर करण्यात आले. मात्र जागे अभावी काम न केल्याने पूर्ण निधीच परत गेला आहे. या चारही गावाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम शेवटच्या टप्प्यात असतानाच चिमूर नगर परिषदेची अधिसुचना जाहीर करण्यात आली. अधीसुचनेमुळे या चारही गावातील नळ योजनेचे काम रखडले आहे. नगर परिषद व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग (जिल्हा परिषद) या वेगवेगळ्या असल्याने कामे करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जोपर्यंत नगर परिषदेला योजना हस्तांतरीत करीत नाही, तोपर्यंत या चार गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही.चिमूर शहराची लोकसंख्या नगर परिषदेचा दर्जा देण्याइतकी नसल्याने वडाळा, सोनेगाव, शेडेगाव, काग, पिंपळनेरी, खरकाडा अशा गावांना नगर परिषदेत सामावून घेण्यात आले. या गावांना नगर परिषदेत सामावल्याने त्या गावांची ग्रामपंचायत बरखास्त करण्यात येवून या पाचशे ते दोन हजार लोकसंखेच्या गावांना नागरी दर्जा देण्यात आला. मात्र नागरी दर्जा मिळाल्यानंतर आपली कामे, अनेक योजना लवकर मिळतील अशी आशा बाळगलेल्या नागरिकांचा सध्यातरी भ्रमनिराश झाला आहे. वडाळा, शेडेगाव, सोनेगाव व काग या चार गावाच्या नळयोजनेचे शेवटच्या टप्याचे काम सुरू असतानाच नगर परिषद झाल्याने शासनाने पूर्ण आर्थिक व्यवहार गोठवून पूर्ण ग्रामपंचायतचे रेकार्ड जमा केले. त्यामुळे या गावातील नळ योजना रखडल्या आहेत. त्यामुळे कडक उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा या गावात जाणवत आहेत. वडाळा (पैकू) मध्ये तर विहिरीने तळ गाठला आहे तर नळाला एक दिवसा आड पाणी येत आहे. त्यामुळे नगर परिषद होवूनही समस्या सुटेना, अशी म्हणण्याची वेळ या गावातील नागरिकांवर आली आहे. (वार्ताहर)
हस्तांतरणात अडकला चार गावांचा पाणीपुरवठा
By admin | Updated: April 16, 2016 00:39 IST