उन्हाची तीव्रता वाढतेयं : अनेक गावात नागरिकांची भटकंती सुरूचंद्रपूर : यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा डिसेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला होता. शेतकऱ्यांसमोर खरीपातही सिंचन प्रश्न उभा ठाकला होता. त्यानंतर रबी हंगामामध्ये पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली होती. आता मार्चमध्ये उन्हाची तीव्रता हळुहळू वाढत असून ग्रामीण भागातील अनेक गावात पाणी टंचाईची झळ पोहचत आहे.या वर्षी पावसाळ्यात वेळेवर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे सर्व कामे आटोपून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत बसला. मात्र मृग नक्षत्रात पाऊस बरसलाच नाही. त्यानंतरही पावसाने उशिराच हजेरी लावली. उशिरा आलेल्या या पावसात शेतकऱ्यांनी बि-बियाणे पेरले. त्यानंतर पावसाची गरज होती. मात्र त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवा त्यावेळी पाऊस न पडल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. काही जणांची पिके सुकू लागली. यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. नलेश्वर, चंदई, लभानसराड या प्रकल्पात जानेवारी महिन्यात पाहिजे तसा जलसाठा नव्हता. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी खालावल्याने नदी, नाले, तलाव, बोड्या हे ग्रामीण भागातील जलस्रोत चिंताजनक स्थितीत आले.या प्रकारामुळे रबी हंगामातही शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागली. विशेष अनेक शेतकऱ्यांनी तर पाणी नसल्यामुळे पारंपारिक रबीचे पिक घेणेही यावर्षी जाणीवपूर्वक टाळले. आता मार्च महिन्याचा पंधरवाडा लोटण्याच्या मार्गावर आहे. उन्हाची तिव्रताही वाढत आहे. ग्रामीण भागातील जलस्रोट आटले आहे. नदी-नाल्यांसोबतच नागरिकांच्या घरातील विहिरी, बोअरवेल यांचेही पाणी कमी झाले आहे. एकूणच पाण्याची पातळीच खोल गेल्याने याचा सर्व जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसर पहाडी भाग आहे. या परिसरातील अनेक गावातील नागरिक आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करीत आहे. आदिवासींचे गुडे पाण्याविना टाहो फोडत आहे. विशेष म्हणजे, या गुड्यातील नागरिकांना चक्क डबक्यातील पाणी पिऊन आपली व कुटुंबियांची तहान भागवावी लागत आहे. दरवर्षी हे विदारक चित्र समोर येते. मात्र संबंधित विभागाकडून यावर आजपर्यंत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे आता येथील नागरिकही आहे त्या परिस्थितीतच वेळ निभावून नेत आहेत. नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही या तालुक्यातीलही अनेक गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषद दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करते. उपाययोजनाही कागदावर असतात. मात्र प्रत्यक्षात पाणी टंचाईची झळ सहन करणारी गावे त्यांच्या यादीतच नसतात. कागदावरील उपाययोजनाही बहुतांश प्रत्यक्षात अमलात येत नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी ओरड उन्हाळाभर सुरू राहते, असा आजवरचा अनुभव आहे. यावर्षीही जिल्हा परिषद तोच कित्ता गिरवणार आहे की खरोखरच पाणी टंचाईवर उपाययोजना करतील, हे पुढे दिसणारच आहे. (शहर प्रतिनिधी)
ग्रामीण पट्टयात पाणी टंचाईची झळ
By admin | Updated: March 11, 2016 01:24 IST