चंद्रपूर : मागील वर्षीच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कोरपना तालुक्यातील नदी-नाल्या शेजारील शेकडो हेक्टर पिकांची अतोनात हानी झाली. शासनस्तरावर त्याची दखल घेऊन सर्व्हे करण्यात आला. नंतर पूरपीडितांना मदतही जाहीर करण्यात आली. तथापि, तालुक्यातील सोनुर्ली (गाडेगाव) येथील तब्बल ९३ शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित राहिल्याची बाब उजेडात आली आहे.तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने गेल्या वर्षी पूरपीडितांचा सर्व्हे केला होता. यामध्ये सोनुर्ली (गाडेगाव) येथील ९३ शेतकऱ्यांच्या जमिनी पुराने खरडून गेल्या. त्यावरील उभी पिके वाहून गेली. तालुक्यातील इतर शेतकऱ्यांप्रमाणे आपणासही शासनाची मदत मिळेल, अशी आशा बाळगून होते. मात्र, अन्य गावातील शेतकऱ्यांना मदत मिळाली, तर सोनुर्लीवासीयांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली.यासंदर्भात श्यामराव बांदूरकर, नारायण डायकी आणि अन्य शेतकऱ्यांनी कोरपना येथील तहसीलदारांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. तेव्हा दोन आठवड्यात ही मदत देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र मदत मिळालीच नाही.दरम्यान, १ आॅक्टोबरला येथील शेतकऱ्यांनी चंद्रपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन अन्याय दूर करण्याची मागणी केली. त्याच दिवशी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आणि अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदने दिली. या निवेदनाची दखल घेऊन ना.अहीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या गंभीर बाबीची तातडीने सोडवणूक करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यावरून आता दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आता कुणाकडे धाव घ्यायची असा प्रश्न येथील आर्थिक संकटात सापडलेल्या त्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)
मागील वर्षीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा
By admin | Updated: December 13, 2014 22:37 IST