विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या विसापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद आरक्षण अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहे. ५ फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी निर्वाचित सदस्यांमधून मतदान होणार आहे.
सरपंचपदावर आपलाच विजय व्हावा म्हणून दोन्ही गटांकडून माेर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, वंचित आघाडीकडे बहुमत असल्याने या आघाडीच्या वर्षा मच्छिंद्र कुळमेथे यांची प्रबळ दावेदारी मानली जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १७ सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये वंचित आघाडीचे नऊ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले असल्याने येथील ग्रामपंचायतीची सत्तासूत्र वंचित आघाडीच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे; परंतु या ग्रामपंचायतीमध्ये भाजपाप्रणीत आघाडीकडे ३, काँग्रेसप्रणीत आघाडीकडे २, शिवसेना २ व अपक्ष १ सदस्य असे एकूण ८ ग्रामपंचायत सदस्य विरोधी म्हणून आहेत. विरोधी गट एकत्र आले, तरी निर्णायक बहुमताचा आकडा जुळत नाही. मात्र, वंचित आघाडीतील एखादा सदस्य विरोधी गटात गेला तर त्यांचे संख्याबळ वाढू शकते. यासाठी उमेदवाराला प्रलाेभने देण्याच्या प्रस्तावाची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दोन्ही गट आपले सदस्य सुरक्षित ठेवून एकमेकांच्या गटातील उमेदवार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकतात, असा अंदाज दिसत आहे.
सरपंचपद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव असून, वंचित आघाडीकडे प्रभाग क्रमांक ३ मधून निवडून आलेल्या वर्षा मच्छिंद्र कुळमेथे तर भाजपा आघाडीकडे प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आलेल्या सुवर्णा कुसराम या उमेदवार आहेत. यापैकी एकीच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार आहे. वंचित आघाडीकडे ९ सदस्यांचे बळ आहे. सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत बहुमत आहे. फाेडाफाेडीच्या राजकारणामुळे चुरस वाढली आहे.