नदी-नाल्यातही पाणी : पावसाने बळीराजा सुखावलाचंद्रपूर : शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला जोरदार पाऊस अद्याप झाला नसला तरी मागील चार पाच दिवसात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत खोळंबून असलेल्या रोवण्यांना आता वेग आला आहे. शेतकरी चिखलणी करून रोवणीची तयारी करू लागला आहे. ज्यांच्या पेरण्या पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर होत्या. त्यातील काही पेरण्या बचावल्या आहे. असाच पाऊस कायम राहिला तर बळीराजा या खरीपात सावरू शकणार आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. आज शनिवारी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस तब्बल एक तास बरसत राहिला. तत्पूर्वी मंगळवार आणि बुधवारीदेखील दिवसभरच पावसाची अधेमधे रिपरिप सुरू राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला आहे.यावर्षी पावसाबाबत प्रारंभपासूनच चंद्रपूर जिल्हा निराशाजनक राहिला. पावसाच्या जुन, जुलै या महिन्यातच पावसाने दडी मारली. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा कमी होता. अस्सल पावसाचा जुलै महिना सुरू असतानाच जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प कोरडे होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनही अडचणीत आले होते. यावर्षी १ जून ते ५ आॅगस्टपर्यंत एकूण ७७३८.७३ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत सरासरी ५१६.९१६ मिमी पाऊस पडला. सर्वसामान्य सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी निम्मीही नाही. जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९७.८४ मिमी पाऊस पडायला हवा. दरवर्षी याहून अधिकच पाऊस पडतो. मात्र यावर्षी जुलै महिन्यात पाऊस सरासरीपर्यंतही पोहचू शकला नाही.जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होताच तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसला. त्यावेळी हवामान खात्यानेही यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही आनंदात होते. या आनंदातच शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. काही शेतकऱ्यांनी मात्र पावसाच्या लहरीपणाचा अनुभव लक्षात घेऊन पेरण्या थांबविल्या. पावसाने आपला लहरीपणा दाखविलाच. जून महिन्यापासून पाऊस जी दडी मारली ती जुलै महिना संपेपर्यंत कायम होती. यात दोनचार दिवसांचा अपवाद होता. पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची स्थिती नाजुक झाली. नदी-नाले आटायला लागले. पेरण्या डोळ्यादेखत सुकू लागल्या होत्या. उलट या कालावधीत जिल्ह्यात कडाक्याचे ऊन्ह तापू लागले. परिणामी शेतकरी वर्ग कमालीचा भयभित झाला होता. दरम्यान, ४ आॅगस्ट आणि ५ आॅगस्टला जिल्ह्यातील सावली वगळता संपूर्ण तालुक्यात पावसाने हजेरी लावली. संततधार नसला तरी पावसाची रिपरिप दोन्ही दिवस सुरूच होती. या पावसामुळे बळीराजा तुर्तास सुखावला आहे. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. आज शनिवारीदेखील दमदार पाऊस झाला. १ जून ते ७ आॅगस्टपर्यत जिल्ह्यात एकूण ७८७९.८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याचे सरासरी प्रमाण ५२५.३२४ इतके आहे.या पावसामुळे शेतात पाणी जमा होऊ लागले असून शेतकरी रोवणीच्या कामाला लागला आहे. सिंदेवाही, मूल, नागभीड, ब्रह्मपुरी आदी तालुक्यात चिखलणीची कामे केली जात आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा होती, त्यांचे पऱ्हे बऱ्यापैकी वाढले होते. त्यांनी आता रोवणी सुरूही केली आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यात रोवणीच्या कामांना वेग
By admin | Updated: August 10, 2015 00:35 IST