भांगडीया यांची माहिती : १७ हजार शिक्षकांना दिलासालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यभरात २५ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत होते. शासनाने यावर्षी राज्यस्तरावरून बदल्या करण्याचे धोरण आखले, मात्र अनेक शिक्षक त्या त्या जिल्ह्यातील कर्जबाकी असल्यामुळे त्यांना बदली होऊनही जाण्याची परवानगी मिळत नव्हती, ही बाब महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्याकडे मांडली. यांची दखल घेत त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला, त्यामुळे शासनाने ७ जुलै शुक्रवारी एक परिपत्रक काढून ही मागणी मान्य केली.यापूर्वी सर्वच आंतरजिल्हा बदल्या जिल्हा स्तरावरून होत होत्या. मात्र याच वर्षांपासून राज्य स्तरावरून आॅनलाईन बदल्या होत आहेत. त्यामुळे अनेकांना न्याय मिळाला. मात्र स्थानिक प्रशासन त्यांची अनेक बाबीत अडवणूक करीत होते. त्यासाठी शासनाने प्रत्येकवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बदल्या केल्या. मात्र बदली झाल्यावर भारमुक्त होतांना त्यांना या जिल्ह्यातील आपले बाकी असलेले कर्ज भरून नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. त्यावेळी शिक्षकांची अडचण होत होती. एकाचवेळी ५ ते १० लाखांचे कर्ज परतफेड करणे अशक्य होते, त्यामुळे इकडून तिकडून पैशांची जमवाजमव करुन पैसे उपलब्ध करण्याचा ते प्रयत्न करत असत. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस हरीश ससनकर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा नेते नारायण कांबळे, संघटक रवी वरखेडे, नरेंद्र मुंगले, सलीम तुर्के, भागवत नेहरकर यांनी चिमूर येथील आमदार भांगडीया यांची अन्यायग्रस्त शिक्षकांसह भेट घेतली. तसेच शिक्षकांची समस्या मांडली. यावेळी भारमुक्त आदेशासह असलेले कर्जही त्या जिल्ह्यात स्थानांतर व्हावे, अशी मागणी केली. तसेच कजार्ची रक्कम पगारातून कपात करुन नियमित कर्जफेड करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आ. भांगडीया यांनी सदर मागणीचा पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने सदर मागणी मान्य केल्याचे पत्रक शुक्रवारला जाहीर केले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बदली झालेल्या १७ हजार शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांच्या कर्जाचे होणार स्थानांतरण
By admin | Updated: July 9, 2017 00:48 IST