मूल : जयकिशन माईदासानी हा कामानिमित्त चंद्रपूरला गेला असता वाहतूक पोलिसांनी त्याचे वाहन पासिंग नसल्याचे सांगून लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार जयकिशनचे वडील सतराम माईदासानी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
मूल येथील किराणा व्यावसायिक सतराम माईदासानी यांचा मुलगा जयकिशन हा २ जानेवारीला चंद्रपूर येथे टाटा एस. गाडीने किराणा माल खरेदी करून मूलकडे जात असताना औषधी घेण्याकरिता जटपुरा गेटजवळ थांबला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या तीन वाहतूक पोलिसांनी गाडीचे पासिंग झाले नाही म्हणून आपणास आठ हजार रुपये दंड भरावा लागेल, असे म्हणाले. यावेळी जयकिशन माईदासानी याने आपले वडील सतराम माईदासानी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी फोन हिसकावून फेकण्याचा प्रयत्न केला व शिव्या देऊन पैसे देतोस की गाडी ठाण्यात लावू, अशी धमकी दिली. त्यावेळी विनवणी केल्यानंतर एक हजार रुपये घेण्यास पोलीस तयार झाले. सदर एक हजार रुपये त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत टाकायला सांगितले. त्याबाबत पावतीची मागणी केली असता अरेरावी व शिव्या देऊन हाकलण्याचा प्रयत्न केला. कोणतेही कारण नसताना आर्थिक व मानसिक त्रास देणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार सतराम माईदासानी यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.