लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारूप पुनर्रचनेमुळे कोरपना तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. एक नवीन जिल्हा परिषद गट व दोन नवीन पंचायत समिती गणांची भर झाल्यामुळे अनेक गावांची गटांमध्ये फोडतोड करण्यात आली आहे. परिणामी, याचे थेट परिणाम तालुक्यातील राजकीय समीकरणांवर आणि स्थानिक नेतृत्वाच्या गणितांवर होत आहेत.
बिबी गाव आता वनसडी-कोडशी - बूज. जिल्हा परिषद गटात समाविष्ट करण्यात आला असून बाखर्डी व तळोधी ही दोन्ही गावे आवाळपूर-भोयगाव गटात समाविष्ट करण्यात आले आहे. वनसडी व आवाळपूर हे दोन्ही नवीन पंचायत समिती गण म्हणून घोषित करण्यात आल्याने कार्यकर्ते संधीचे सोने करण्याच्या तयारीत लागले आहे. अनेक गावांचा नव्या गणांमध्ये समावेश झाल्याने राजकीय कार्यकर्त्यांच्या मतदारसंघांचा चेहरामोहराच बदलला आहे.
गट पुनर्रचना राजकीय परिणाम करणारी ठरणारही गट-गण पुनर्रचना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. अनेक इच्छुक उमेदवारांचे कार्यक्षेत्र दुसऱ्या गटात गेले आहे. त्यामुळे नवीन मतदारसंघांत पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे लागणार आहे.
परंपरागत वर्चस्व असलेल्या नेत्यांना नवीन आव्हान पंचायत समिती गणांची अदलाबदल झाल्याने व पुनर्रचनेत वेगवेगळी गावे समाविष्ट झाल्याने परंपरागत वर्चस्व असलेल्या नेत्यांसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे. एकूणच या बदलामुळे गटनिहाय सत्ता-समीकरणे पूर्णतः नव्याने मांडली जाणार आहेत.
निवडणुकीत राहणार चुरसबिबी-वनसडीत तर बाखर्डी, तळोधी आवाळपुरात समाविष्ट झाले. अशाप्रकारे गावांची पुनर्बाधणी झाल्याने कोरपना तालुक्यात राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर नवे समीकरण उभे राहत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत याचे पडसाद निश्चितपणे उमटणार असून, चुरस अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत.
नवीन नेतृत्व उभे राहण्याची शक्यतादोन पंचायत समिती गण व एक जिल्हा परिषद गट नव्याने निर्माण झाल्याने नवीन नेतृत्व उदयास येण्याची संधी निर्माण झाली आहे.