बी. यू. बोर्डेवार लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (चंद्रपूर): सीमावर्ती जिवती तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून जमीन पट्टे वितरित करण्यात आले आहेत. मात्र, संबंधित जमिनीवर तेलंगणावनविभागाने आपला हक्क सांगत पेरणीस मज्जाव केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चंद्रपूर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी करत समस्या लवकरच सोडवली जाईल, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली.
जिवती तालुक्यातील हिरापूर खडकी हे गाव महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील वादग्रस्त १४ गावांच्या यादीतील परिस्थिती येथेही दिसून येत आहे. येथील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून जमिनीचे पट्टे मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली असतानाच तेलंगणाच्या वनअधिकाऱ्यांनी या जमिनीवर वृक्षारोपण केले जाईल, तुम्ही जागा रिकामी करा, असा इशारा दिला.
या पार्श्वभूमीवर हिरापूर खडकीचे सरपंच सीताराम मडावी, पोलिस पाटील जंगू सोयाम, तिरुपती पोले, शिवाजी पोले, शेषराव सुरनर, केशव सुरनर, शिवाजी देवकते, नामदेव सुरनर, गणेश पोले, विठ्ठल बिडकर आदींनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांची भेट घेत त्यांच्या समोर आपले गाऱ्हाणे मांडले. माजी आमदार धोटे यांनी चंद्रपूर वनविभागाचे अधिकारी व विरुर वनपरिक्षेत्र अधिकारी महेश दिघे यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. महाराष्ट्र वनविभागाने आश्वासन दिले. पण, अजूनही ठोस पाऊले उचललेली नाहीत. त्यामुळे हिरापूर खडकी येथील शेतकरी संकटात सापडले आहेत.
"तेलंगणाच्या सीमेवरील जिवती तालुक्यातील हिरापूर खडकी येथील आदिवासी शेतकरी बऱ्याच वर्षापासून शेती करीत आहेत. महाराष्ट्राने त्यांना जमिनीचे पट्टे दिले. मात्र, तेलंगणा वनविभागाने मनाई केली. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची तत्काळ दखल घ्यावी."- सुभाष धोटे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस, चंद्रपूर