भद्रावती : दुचाकीवर घेऊन जाऊन जंगलात आपल्यावर जबरदस्ती करणार्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोहबाळा येथील एका पिडीत महिलेने पत्रपरिषदेतून केली. २४ एप्रिल रोजी राजुरा येथे लग्नाला जात असताना चंद्रपूर येथील बसस्थानकावर आपल्याच घराजवळील युवक संदीप खरे हा भेटला. त्याने राजुराला जायचे आहे व मी तुम्हाला राजुराला सोडून देतो, असे सांगून आपल्या दुचाकीवर बसवून घेऊन गेला. दरम्यान बल्लारपूर जवळ लघुशंकेचा बहाणा करून त्याने गाडी थांबविली व चाकू काढून जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. तसेच जबरदस्तीने आपला हात पकडून आपणास जंगलात घेऊन गेला व आपले पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. आपल्यावर जबरदस्ती करू लागला. त्यामुळे आरडा-ओरड करून त्याच्या तावडीतून सुटून रस्त्यावर आली. त्यानंतर त्याने पती व मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन गाडीवर बसवून बल्लारपूर बसस्थानकावर सोडून दिले. यानंतर लग्नावरुन परत मोहबाळा येथे आल्यानंतर सुद्धा त्याने आपणास त्रास देणे सुरू केले. याबाबत पतीला घडलेला प्रकार सांगून १ मे रोजी भद्रावती पोलीस स्टेशनला तक्रार दिली. परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आरोपी एका दिवसातच जमानतीवर सुटला, असा आरोपही पिडीत महिलेने केला. सुटका झाल्यानंतर तुम्ही माझे काहीच बिघडवू शकत नाही, असे म्हणून आणखी त्रास देणे सुरू केल्याचेही महिलेने सांगितले. (शहर प्रतिनिधी)
विनयभंग प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा
By admin | Updated: May 18, 2014 00:12 IST