चंद्रपूर : जमनजट्टी परिसरात अस्वलाचा मुक्तसंचार असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका महिन्यात जखमी केल्याच्या दोन घटना घडल्या आहे. त्यामुळे अस्वलाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक अमोल शेंडे यांनी केली आहे. यासंदर्भात उपमुख्य वनसंरक्षकांना शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. शिष्टमंडळात यंग चांदा ब्रिगेडचे गौरव जोरगेवार, विशाल सातपैसे, दिलीप महाडोळे, शुभम वानखेळे, शुभम लाकडे, अक्षय बनकर आदींची उपस्थिती होती.
मागील काही दिवसांपासून लालपेठ, जमनजट्टी परिसरात अस्वलांची दहशत आहे. सकाळी भ्रमंतीकरिता जाणाऱ्या नागरिकांवर या अस्वलाने प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. लालपेठ येथील मधुकर आत्राम यांच्यावर हल्ला करून जखमी केले. जमनजट्टी परिसर हा जंगलाने वेढला असून, या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.