खांबाडा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, शाळा संस्था, स्वराज्य संस्था आदीसह विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र महिना लोटूनही परिसरातील अनेक कार्यालये व गावातील रस्त्यावरची घाण स्वच्छ झाली नाही. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान खांबाडा परिसरात केवळ देखावा ठरत असल्याचे बोलले जात आहे. महात्मा गांधी जयंती दिनापासून शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली आहे. शासकीय कार्यालयासह शहरात व ग्रामीण भागात हे अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अधिकारी, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी आपापल्या भागात स्वच्छता अभियान राबविली. मात्र ही मोहीम केवळ एक दिवसापुरतीच मर्यादित राहिली. हातात झाडू घेऊन छायाचित्र काढून केवळ देखावा निर्माण करण्यात आला. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून गावामध्ये पुन्हा कचरा व घाण दिसून येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांनी स्वत: परिश्रम घेऊन स्वच्छतेचा उपदेश केला. त्यामुळे त्यांच्या सांगण्याचा प्रभाव पडून त्याचे विचार नागरिकांनी आत्मसात केले होते. शासकीय कार्यालयातील शौचालयाची अवस्था बघूनच शौचालयाला न गेलेले बरे, असा विचार येतो.गुटखा, तंबाखू, सिगारेट, बिडी यामुळे आणखी घाणीचे साम्राज्य वाढत आहे. शासकीय परिसर, आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्रसुतिगूह, पशुवैद्यकीय दवाखाने तसेच तलाठी कार्यालयाचे परिरसर हे बघण्यासारखे आहेत. शासन स्वच्छतेसाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे.परंतु शासकीय यंत्रणा व नागरिकांमध्येच उदासीनता दिसून येत आहे. अनेक गावात अद्याप रस्त्यावरच शौचविधी आटोपला जातो. जोपर्यंत पदाधिकारी अधिकारी व जनता आपली मानसिकता बदलविणार नाही, तोपर्यंत गावे स्वच्छ होऊ शकणार नाही.त्यामुळे स्वच्छ भारत अभियान केवळ फार्स असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)
स्वच्छ भारत अभियान केवळ देखावा
By admin | Updated: December 18, 2014 22:52 IST