उन्हाचा तडाखा : शाळेत चूल पेटलीच नाहीखांबाडा : उन्हाळी सुट्यांमध्ये देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराला विद्यार्थ्यांनी स्वत:हून नकार दिल्याने शाळेत पोषण आहाराची चुल पेटलीच नसल्याचे वास्तव्य आहे. अनेक शाळांत साहित्यच नसून घरी पोटभर जेवन मिळताना नुसत्या वरण भातासाठी विद्यार्थी शाळेत जाणार कशाला, असे पालकांचे म्हणणे आहे. जिल्ह्याची अनेक गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आली आहे. त्यामुळे शासनाने या गावांत काही विशेष योजना लागु केल्या. तसेच शालेय विद्यार्थ्यांना कुपोषणाची लागण होऊ नये म्हणून उन्हाळ्याच्या सुटीतही शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश दिले. विद्यार्थी वरण, भात खाण्यासाठीच दररोज शाळेत येतील काय, हा प्रश्न सुरुवातीलाच समोर आला. आता १० मे पासून शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या. सुट्या लागण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी दररोज शाळेत येण्याचे निमंत्रणही दिले. मात्र तरी सुद्धा विद्यार्थी शाळेपासून दूर पळाले. परिणामी कोणत्याही शाळेत पोषण आहार घेण्यासाठी विद्यार्थी फिरकले नसल्याचे दिसून येत आहे. तर काही शाळांमध्ये पोषण आहारच शिजविण्याकरीता उपलब्ध नाही.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मधल्या दीर्घ विश्रांती दरम्यान पोषण आहाराचे वाटप केले जाते. यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० ग्रॉम तांदळाचा भात व त्यासोबत तुरदाळ किंवा मुंगदाळीचे वरण अथवा चवळी, वटाणा, हरभरा याची मिसळ दिले जात. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५० ग्रॉम तांदळाचा भात व सोबत वरण किंवा मिसळ देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्या आहारातून विद्यार्थ्यांना पोषक द्रव्ये मिळतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. गरीब कुटुंबाच्या घरीही पोळी, भात, भाजी, वरण या पदार्थांचा जेवणामध्ये नेहमीच समावेश असतो. घरी पोटभर अन्न मिळत असताना नुसते वरण भात खाण्यासाठी जाणार कशाला असा प्रश्न आहे. (वार्ताहर)
पोषण आहाराला विद्यार्थ्यांचा नकार
By admin | Updated: June 9, 2015 01:36 IST