साईनाथ कुचनकार -चंद्रपूरजिल्ह्यातील काही शिक्षकांनी पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी नवीन शक्कल लढविली आहे. नोकरी करीत असतानाच बी.एड्.ला प्रवेश घेऊन एकाच वेळी शिक्षण आणि शिक्षकाची नोकरी करीत शासनाची दिशाभूल केली आहे. मात्र पूर्वपरवानगीशिवाय विद्यार्थी बनलेल्या या शिक्षकांवर गडांतर येणार असून कारवाईला त्यांना समोर जावे लागणार आहे.जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात शिक्षक आहे. मात्र यातील काही शिक्षकांनी बीएड् पदवी प्राप्त करून पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी नवीन शक्कल लढविली आहे. नोकरी करीत असतानाच शासनाची कोणतीही परवानगी न घेता बीएड्ला प्रवेश घेतला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर, शाळेमध्ये ज्या दिवशी हजेरी आहे त्या दिवशी बीएड् महाविद्यालयामध्येसुद्धा हजेरी लावली. त्यामुळे या शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांना शिकविले की, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या सर्व शिक्षकांची चौकशी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ज्या शैक्षणिक सत्रामध्ये शिक्षकांनी बी.एड् केले. ज्या शैक्षणिक वर्षात कोणताही रजेचा अर्ज जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केला नाही. अनधिकृतपणे शाळेत गैरहजर राहून परस्पररित्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन बी.एड्. अभ्यासक्रम पूर्ण केला. एवढेच नाही तर, अभ्यासक्रमानंतर मिळालेल्या पदवीनुसार पदोन्नतीसाठी प्रशासनाकडे अर्जसुध्दा केला आहे. बीएड् अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संस्थेमध्ये ७५ टक्के कालावधीची उपस्थिती असणे अनिवार्य आहे. असे असतानाही शिक्षकांनी रजा न घेता बीएड्चा अभ्यासक्रम नियमितपणे पूर्ण केला आहे.प्रशासनाने शिक्षकांना बीएड करण्याबाबत पूर्व परवानगी दिली नसतानाही शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. काही शिक्षकांनी वैद्यकीय रजा दाखवून, शाळेमध्ये अनधिकृतरित्या गैरहजर राहिले आहे. मात्र त्याच वेळी बीएड महाविद्यालयामध्ये त्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ठिक नसतानाही ते बीएड महाविद्यालामध्ये गेलेच कसे, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे. शासनाची दिशाभूल करणार्या या शिक्षकांची प्रशासकीय चौकशी करून त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
पूर्वपरवानगीशिवाय शिक्षक बनले विद्यार्थी
By admin | Updated: June 8, 2014 23:46 IST