फोटो
घुग्घुस : घुग्घुस लोक वसाहतीला लागून असलेल्या लायड मेटलच्या कारखान्यातून मागील काही दिवसांपासून प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेतीच्या पिकावर विपरीत परिणाम होत आहे. या प्रदूषणावर नियंत्रण आणावे, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गणेश शेंडे, घुग्घुस शहरप्रमुख घोडपडे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनातून केली.
येथील लोक वसाहतीला लागून असलेल्या लायड मेटलचा कच्चे लोखंड बनविण्याचा कारखाना आहे. त्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जीवघेणे प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. हृदयविकार, दमा, चर्मरोग, अस्थमा तर बालकांना, मोठ्या माणसाला मोकळा श्वास घेणे मुश्कील झाले आहे. आपले आरोग्य चांगले व निरोगी राहावे, यासाठी लोक माॅर्निंग वॉक, सायंकाळी वाॅकिंगसाठी घराबाहेर निघतात. मात्र लायड मेटलच्या प्रदूषणामुळे श्वासाचा त्रास होऊ लागला आहे. याबरोबरच वेकोलीच्या हँडलिंग प्लांट हा गावाच्या पूर्व दिशेला तर उत्तर दिशेला रेल्वे सायडिंग आहे. या दोन्ही ठिकाणावरून कोळशाची धूळ उडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना वारंवार निवेदन देऊन लायडचे जीवघेणे प्रदूषण थांबविण्यासाठी अनेकदा निवेदन दिले. आंदोलनेही झाली. मात्र कारखान्याचे व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे जीवघेणे प्रदूषण सुरूच आहे. सदर प्रदूषण थांबविण्यासाठी शुक्रवारी घुग्घुसवरून वणीकडे जात असताना घुग्घुसच्या छोटेखानी कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना गणेश शेंडे, युवराज घोडपडे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे, गजानन बांदुरकर, रघुनाथ धोंगळे, प्रकाश मेहता, अजय जोगी यांनी निवेदन दिले.