चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात अनेक त्रुटी असून कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तसेच हजारो कोटी रुपये तोट्यात असलेल्या एमएसईबीमधील कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात आलेली आहे. एसटी कामगारांना एमएसईबीप्रमाणे वेतन मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे विभागीय अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष विजय बोरगमवार यांच्या नेतृत्वात विभागीय नियंत्रक महेंद्र भैसारे यांना निवेदन देऊन करण्यात आली.निवेदनात प्रामुख्याने औद्योगिक कलह अधिनियम १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करण्यात यावा व एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा. २००० ते २०१२ पर्यंत ज्या कामगारांना कनिष्ठ वेतनश्रेणीत तीन वर्षापेक्षा जास्त व पाच वर्ष अथवा अधिक सेवा पूर्ण केली आहे. अशा कर्मचाऱ्यांचे ज्यावेळी तीन वर्ष सेवा पूर्ण झाली आहे, त्यावेळी नियमित वेनतश्रेणी देऊन वेतन निश्चिती करण्यात यावी. १ एप्रिल २०१२ नंतर कनिष्ठ वेतनश्रेणी नियमित वेतनश्रेणीत येताना १३ टक्के कराराचा फायदा देण्यात आलेला नाही. अशा कर्मचाऱ्यांना कराराचा १३ टक्के फायदा देऊन वेतन निश्चित करावे. चालक- वाहक यांच्या ड्युटी एलोकेशन टी- रोटेशनची अंमलबजावणी करण्यात यावी. महिलांना कायद्यानुसार मिळणाऱ्या सोयी प्रदान करण्यात याव्या. अप्रेंटिस उमेदवारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे विद्यावेतन तत्काळ अदा करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे विभागीय अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष विजय दोरगमवार यांच्या नेतृत्वात विभाग नियंत्रक महेंद्र भैसारे यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात विभागीय सचिव शकील अहमद, कोषाध्यक्ष अशफाक आगार अध्यक्ष नौशाद आगार, सचिव अकरम खान, विभागीय कार्याध्यक्ष अयुब खान उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
एसटी वर्कर्सचे विभाग नियंत्रकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 01:08 IST