चंद्रपूर : एककल्ली धोरणाने वागून आणि पक्षाच्या संविधानाचा जराही विचार न करता प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी चुकीचे निर्णय घेतले. यामुळे पक्ष खिळखिळा झाल्याचा आरोप करीत बुधवारी पुगलिया गटाने खुद्द प्रदेशाध्यक्षांवरच तोफ डागली. त्यांना पाठविलेल्या पत्रातून अनेक गंभीर आरोप करीत २0 मे रोजी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या सभेला उपस्थित राहा आणि आत्मपरीक्षण करा, असे निमंत्रणही या गटाने माणिकराव ठाकरे यांना पत्रातून धाडले आहे.गेल्या आठवडाभरापासून काँग्रेसधील पक्षांतर्गत वाद पेटला आहे. पुगलिया आणि देवतळे या दोन्ही गटांकडून एकमेकांवर पत्रकवार सुरू आहेत. या वादाचा मोर्चा आता मुंबईकडे वळला आहे. काल देवतळे गटाकडून दोन्ही नवनियुक्त अध्यक्षांनी पुगलिया गटाला दिलेल्या खरमरित उत्तरानंतर बुधवारी पुगलिया सर्मथक मानले जाणारे माजी आमदार बाबूराव वाघमारे, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी आणि जिल्हा मजदूर काँग्रेसचे महासचिव साईनाथ बुचे यांनी प्रदेशाध्यक्षांना संयुक्त सहीचे पत्र पाठवून अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत.२00९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम करणार्या व्यक्तीलाच या वेळी लोकसभेची उमेदवारी दिल्याचा मुद्दा पत्रातून मांडला आहे. या सोबतच, चार वर्षांपूर्वी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या व्यक्तीला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देणे, मनपातील स्थायी समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन विरोधी पक्षाशी हातमिळवणी करून समितीचे अध्यक्षपद मिळविणार्या व्यक्तीला शहर जिल्हाध्यक्षाचे पद देणे हे प्रकार प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी पक्षाच्या संविधानाला न जुमानता केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकार आर्थिक देवाणघेवाणीतून केल्याचा गंभीर आरोपही या पत्रातून करण्यात आला आहे. अध्यक्षपदावरून ठाकरे यांनी पक्षाचा खेळखंडोबा चालविल्याचा आरोप असून या प्रकाराची माहिती पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना प्रत्यक्ष भेटून देण्याचाही इशारा या पत्रातून त्यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीचा एककल्ली निर्णय
By admin | Updated: May 8, 2014 02:56 IST