बल्लारपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावर कुल्हडऐवजी कागदी कपामधून चहा मिळत असल्याची बाब ‘लोकमत’ने उघड करताच रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत स्टाॅलधारकांना खडसावताच त्यांनी आता कुल्हडमधून चहा विकणे सुरू केले आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी देशातील सर्व रेल्वे स्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी रेल्वे स्थानकावर ‘कुल्हड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला. परंतु महिनाभराचा कालावधी लोटूनही बऱ्याच रेल्वे स्थानकावर पेपर कपमधूनच चहा देण्यात येत होता. बल्लारशाह रेल्वे स्थानकावरही कुल्हडऐवजी पेपर कपमध्ये चहा मिळत होता. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणताच रेल्वे अधिकाऱ्यांनी याची दाखल घेऊन बल्लारशाह रेल्वे स्थानकावर येऊन स्टॉल संचालकांची कानउघाडणी केली. कोविड नियमांचे पालन करण्याची समज दिल्यानंतर स्टॉल चालकांनी ऑर्डर देऊन कुल्हड बोलाविले आहे. फूड प्लाझाच्या संचालकांनी दिल्ली येथून ‘कुल्हड’ बोलावले आहे.
सध्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावर निरीक्षण करण्यासाठी जीएम स्पेशलचा दौरा आहे. दररोज येथे मध्य रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, सिनिअर डिव्हिजन कमर्शिअल मॅनेजर कृष्णात पाटील, तसेच आशुतोष श्रीवास्तव (ऑपरेशन), डीआरएम ऋचा खरे स्टेशनवरील गैरसोयींबाबत सतर्कता बाळगून आहे.