मूल बफर झोन क्षेत्र : वनविभागाचा उपक्रम राजू गेडाम मूलउन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने नाले, पाणवठे, बंधारे यात पाणी नसते. त्यामुळे पाण्यासाठी वन्यप्राण्यांना इतरत्र भटकंती करावी लागते. जंगलात वीज नसल्याने मोटारपंप लावणे कठीण होत असते. हे हेरून सूर्यप्रकाशावर चालणारे सौर ऊर्जा हातपंप उभारण्याचा उपक्रम मूल बफर झोन परिक्षेत्रात राबविण्यात आला आहे. मूल वनपरिक्षेत्रातील जानाळा व डोनी या जंगलव्याप्त परिसरात सौर उर्जापंप उभारल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची पातळी खोलवर जाते. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असते. जंगलव्याप्त परिसरात पाण्यासाठी मोटार पंप लावणे आवश्यक असते. पाण्यासाठी वन्यप्राणी गावाकडे कूच करताना आढळतात तर केव्हा पाण्यासाठी भटकता भटकता शिकारी आपल्या जाळ्यात ओढून घेत असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होता कामा नये यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोन परिक्षेत्रातील जानाळा कक्ष क्र. ३५३ व डोनी कक्ष क्र. ३२७ येथे सौर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविले आहे. एका पंपासाठी लागणाऱ्या यंत्रणेसाठी जवळपास १ लाख ८५ हजार रुपये खर्च आहे. जानाळा आणि डोनी या जंगलव्याप्त परिसरात सौरउर्जेवर चालणारे हातपंप लावल्याने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नियमीत पाणी येत असून जवळपास असणारे डबके, नाले, पाणवठे पाण्यानी भरले जात आहे. नियमित केलेल्या निरीक्षणातून सदर डबक्यातील पाण्याजवळ वाघ, रानगवे, अस्वल, सांबार, हरिण, आदी हिंस्त्र प्राण्याचे ठसे आढळल्याचे वनअधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जानाळा व डोनी परिसरात सौर उर्जेवर चालणारे हातपंप लावण्यात आले ही बाब वन्यप्राण्यांसाठी दिलासा देणारी आहे. मात्र वनविभागाची तेवढीच जबाबदारीसुद्धा वाढली आहे. या परिसरात वन्यप्राणी असतात, हे हेरून शिकारी शिकारीसाठी येण्याची शक्यता बळावली आहे. तसेच अवैध वृक्षतोड करणारे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यास वन्यप्राण्यांना पाणी मिळणार नाही. यासाठी वेळोवेळी वनविभागाने लक्ष देणे आवश्यक आहे.- उमेश झिरे,पर्यावरण मित्र मूलपरिक्षेत्रातील जानाळा व डोनी परिसरात सौर ऊर्जेवर चालणारे सौरपंप लावलेल्या ठिकाणी नेहमी वनमजूर जात असून वेळोवेळी पाहणी करीत असतात. वन्यप्राण्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. वनरक्षक व आपण सुद्धा वेळेवेळी भेट देऊन आढावा घेतला जात आहे. - ओमप्रकाश पेंदोर,वनपरिक्षेत्र अधिकारी मूल