संगणीकृतची गरज : नागरिक मिळत नाही दाखलेसिंदेवाही : सुमारे १०० वर्षांपूर्वीचे जुने महसुली रेकॉर्ड आता पुर्णपणे जीर्ण झाले आहे. या रेकॉर्डचे संगणकीकरण करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा हे रेकॉर्ड नेस्तनाभूत होण्याचा धोका वाढला आहे. महसूलसोबत कोणत्याही कार्यालयात जुने रेकॉर्ड जपून ठेवले जाते. मात्र हे रेकॉर्ड अत्यंत जीर्ण झाले आहे. कागदपत्राच्या गठ्यांमधून व्यवस्थित कागद काढणे कठीण झाले आहे. अनेकांना जुना रेकॉर्ड उपयोगी पडते. एखाद्या नागरिकाने रेकॉर्ड मागणीकरिता अर्ज सादर केल्यानंतर त्याला हे कागदपत्र देताना पाने फाटलेली आढळतात. अनेक शासकीय कार्यालयामध्ये रेकॉर्ड ठेवलेल्या खोलीमध्ये पावसाळ्यात पाणी गळते. त्यामुळे जुने रेकॉर्ड आता अत्यंत खराब झाले आहे. रेकॉर्ड जीर्ण असल्यामुळे संबंधित लिपीकाकडून नक्कल पुरविता येत नाही, अशी उत्तरे मिळतात.ग्रामस्थांना १० वर्षांपूर्वी ज्या रेकॉर्डची प्रत काढली, त्याची पुन्हा प्रत काढण्यासाठी मागणी केली असता ते रेकॉर्डच जागेवर आढळून येत नाही. परिणामी नेमके ते रेकॉर्ड गेले कुठे , त्या पानाचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेकॉर्ड गहाळ होण्यास संबंधित लिपीकही जबाबदार नसतो. अनेक वर्षात अनेक लिपीकांच्या हातून रेकॉर्ड गेले असतात. पाने चाळताना ते कागदपत्र आणखी जीर्ण होतात. त्यामुळे कागदपत्राचा चुराडा होतो. मात्र रेकॉर्ड मिळत नसल्याने जनतेचे हाल होतात. जन्म नोंद, कोतवाल बुकाची नक्कल, हक्क नोंदणी हा जुना पुरावा जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्राकरिता मागण्यात येतो. त्याच पुराव्याच्या आधारे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते. वर्षानुवर्षे ही कागदपत्रे तहसीलमध्ये बांधून पडलेली असतात. (शहर प्रतिनिधी)
सिंदेवाहीत जुने महसुली रेकॉर्ड जीर्ण
By admin | Updated: July 30, 2014 23:54 IST