वरोरा : हमीभावाने पणन महासंघाने राज्यातील अनेक केंद्रावर कापूस खरेदी केला. कापूस खरेदी १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर, या हंगामातील हमीभावाने कापूस खरेदी बंद करण्यात येणार आहे, पण महासंघाकडे नोंदणी केलेल्या सात हजार शेतकऱ्यांनी अजूनही कापूस अद्यापही विक्रीकरिता आणलेला नाही.
हमीभावाने कापूस विक्रीकरिता दहा हजार ३१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील तीन हजार २५६ शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे ७४ हजार १२५ क्विंटल कापसाची विक्री केली. सात हजार ६२ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विक्रीकरिता अद्यापही कापूस आणलेला नाही. बाजार समितीच्या वतीने सदर शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला जातो, परंतु शेतकरी प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. आता या शेतकऱ्यांचा शोध कसा घ्यावा, असा प्रश्न बाजार समितीला पडला आहे.
उलट खासगी जिनिंगमध्ये २२ हजार ८२३ शेतकऱ्यांनी दोन लाख ९३ हजार क्विंटल कापूस विकला आहे. खासगी जिनिंग व पणन महासंघाच्या दरामध्ये मध्यंतरी अधिक फरक नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी जिनिंगमध्ये कापूस विकल्याचे मानले जात आहे. पणन महासंघाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात कापूस विकल्याचे दिसून येत आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारीपूर्वी स्वामी जिनिंग माडा रोड येथे शेतकऱ्यांनी कापूस विक्री आणावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे, उपसभापती देवानंद मोरे, सचिव चंद्रसेन शिंदे यांनी केले आहे.