फायर आॅडीटही नाही : बहुतांश हॉटेल्समध्ये अग्निशमन किट नाहीरवी जवळे - चंद्रपूरइतर दुर्घटनेसोबतच आगीच्या दुर्घटनाही गंभीर समजली जाते. आगीचा भडका क्षणार्धात इतरत्र पसरत असल्याने यात मोठी हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांसोबतच ज्या दुकानात वा प्रतिष्ठानात ग्राहकांची गर्दी असते, त्या ठिकाणी अग्निशमन सुरक्षा अत्यावश्यक आहे. मात्र शहरातील हॉटेल्सचालकांनी या सुरक्षा यंत्रणेला बाजूला सारले आहे. बोटावर मोजण्याइतक्या हॉटेल्समध्ये फायर आॅडीट झाले असून इतर हॉटेल्समध्ये आगीसारख्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कुठली यंत्रणाच नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे येथील ग्राहकांची सुरक्षा ऐरणीवर आहे. जिल्ह्यात यापूर्वी आगीसारख्या घटनांमध्ये अनेकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी फर्म, दुकान, हॉटेल्स, मॉल यासारख्या गर्दी असलेल्या ठिकाणी आग लागलीच तर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी अग्निशमन कीट असावी, असे शासनाचे संकेत आहे. अग्निशमन पथक येण्यापूर्वी स्थानिक पातळीवर असलेली ही छोटीशी यंत्रणा आग पसरू देणार नाही, असा त्यामागील उद्देश आहे. मात्र कुणीही या भानगडीत पडत नाही. २०१२ मध्ये मुंबई येथील मंत्रालयाला आग लागल्यानंतर शासन खडबडून जागे झाले होते. राज्यातील मनपा, नगरपालिका हद्दीतील कार्यालये, मॉल्स, मोठी प्रतिष्ठाने, इमारती यांचे फायर आॅडीट करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. प्रारंभी शासनाच्या या आदेशाला मनपा, नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतले. मात्र काही दिवसानंतर यादृष्टीने कोणतेही गंभीर पावले उचलण्यात आली नाही. परिणामी शासनाच्या आदेशानंतरही अनेक इमारती फायर आॅडीटविनाच उभ्या आहेत. चंद्रपूर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी बाहेरगावांवरून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्यामुळे सहाजिकच हॉटेल्समध्ये दिवसभर ग्राहकांची गर्दी दिसून येते. शहरातील काही हॉटेल्स तर नेहमी गर्दीने फुलून असतात. आगीसारखी अनुचित घटना घडली तर शहरातील हॉटेल्समध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एखादी प्राथमिक यंत्रणा कार्यान्वित आहे काय, याची आज सोमवारी ‘लोकमत’ने पाहणी केली. यात बहुतांश हॉटेल्समध्ये अशी कोणतही यंत्रणा तर सोडाच; साधी अग्निशमन कीटही नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. एकट्या चंद्रपूर शहरात ४०० ते ५०० हॉटेल्स आहेत. प्रतिनिधीक स्वरुपात सोमवारी ‘लोकमत’ने यातील काही हॉटेल्समध्ये जाऊन आगीच्या संदर्भात कुठली सुरक्षा यंत्रणा आहे, याची पाहणी केली. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग या गजबजलेल्या मार्गावरील हॉटेल्समध्ये अशा प्रकारची कुठली यंत्रणाच नसल्याचे दिसून आले. प्रियदर्शिनी मार्गावरील दोन बड्या हॉटेल्समध्येदेखील दर्शिनी भागात अग्निशमन कीट बसविण्यात आली नसल्याचे दिसून आले. उल्लेखनीय असे की हॉटेल्समध्ये दिवसभर गॅस सुरू असते. अतिरिक्त सिलिंडरही पडून असतात. या परिसराचा दररोज आगीशी संबंध येत असल्याने या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन कीट असणे अत्यावश्यक आहे. मात्र बोटावर मोजण्याइतक्या हॉटेल्समध्येच अशी कीट आहे.
हॉटेल्समध्ये सुरक्षा ऐरणीवर
By admin | Updated: December 22, 2014 22:43 IST