मुख्याध्यापकाची मागणी : तीन दिवसांपासून विद्यार्थी अध्यापनापासून वंचितलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने आरटीई कायदा केला. या कायद्यानुसार सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळणे हा अधिकार आहे. मात्र चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापक मागणीसाठी गावातील एकलव्यांनी चक्क शाळेवरच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शाळा ओस पडली असून या प्रकारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.चिमूरपासून ३० किलोमिटर अंतरावर असलेल्या काजळसर येथे विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ७ पर्यंत शाळा आहे. आजघडीला इयत्ता १ ते ७ पर्यंत २०५ पटसंख्या आहे. सात वर्ग असलेल्या शाळेवर सहा शिक्षक कार्यरत असून त्यातील प्रभारी उच्चश्रेणी मुख्याध्यापक अनेक महिन्यांपासून शाळेवर येत नाहीत. आलेच तरी शिकविण्याच्या मानसिकतेत राहत नसल्याचा आरोप पालकांनी केला.शिक्षकाच्या मागणीसंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा पंचायत समितीकडे निवेदन देवून शिक्षकाची मागणी केली. मात्र अधिकाऱ्यांनी पालकाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मात्र शिक्षकाअभावी पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने सभा घेवून शिक्षकाची पुर्तता करेपर्यंत शाळेत आपले पाल्य न पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १७ जुलैपासून काजळसर येथील शाळा ओसाड पडली आहे. शाळेतील उर्वरित शिक्षक शाळेवर जावून ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांविना हजर राहून परतावे लागत आहे. या बहिष्कारामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे.
काजळसर येथील विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:09 IST