साहित्यात तालुक्याचे मोठे योगदान: ६४ वे विदर्भ साहित्य संमेलननागभीड : चंद्रपूर जिल्ह्याच्या जडणघडणीत नागभीड तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. या जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्राच्या प्रगतीत या तालुक्याने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. असे भाग्य लाभलेल्या या तालुक्यातील तळोधी (बा.) नगरीत ६४ वे विदर्भ साहित्य संमेलन होऊ घातले आहे. या संमेलनानिमित्त सारस्वतांचा जणू येथे मेळाच भरणार आहे. या सारस्वतांना ऐकण्यासाठी परिसरातील रसिक आतूर आहेत.आधुनिक चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास राजगोंड वंशापासून आरंभलेला असला तरी त्याचा उगम प्राचीन काळात सापडतो. या ऐतिहासिक जिल्ह्याने कृत-त्रेत, द्वापर आणि कलीयुग अशी चारही युगे पाहिली आहेत, अशी इतिहासाची साक्ष आहे. ही साक्ष इतिहासकार रामायण व महाभारत या महाकाव्यातून पुरावे म्हणून देतात. वैनगंगेच्या आणि वर्धा नदीच्या खोऱ्यातील भूमीच नाही तर दख्खनचा पठार हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा निर्वाळा भूसंशोधकांनी व इतिहास संशोधकांनी दिला आहे. असे ऐतिहासिक महत्व असलेल्या या तालुक्याची साहित्यसेवाही त्याच तोलामोलाची आहे.या तालुक्यात साहित्यसेवेचे व्रत घेणाऱ्यात जेष्ठ रंगकर्मी यशवंत भूते यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. शिक्षकी पेशाला तिलांजली देऊन या माणसाने संगीत नाटकांची सेवाच नाही तर नाटके, दंडारी लिहून साहित्याची सेवा केली. फुलामुलांचे कवी म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात ख्यातकीर्त झालेले वा.ना. विगम हेसुध्दा नागभीडचेच. अनेक बालकवितांचे संग्रह विगम यांच्या नावे आहेत.विगम यांनी मराठी काव्य क्षेत्रात जी उंची १९५० च्या दशकात प्राप्त केली, तीच उंची आज नागभीड येथील प्रा. राजन जयस्वाल यांनी केली आहे. स्वत: अमराही असलेल्या या माणसाने अनेक काव्यसंग्रह, समिक्षा ग्रंथ लिहून मराठीची जी सेवा केली, ती खरोखरच प्रशंसनीय आहे. चौसर, चौफेर, चौकार ही काव्यसंग्रह आणि कानेटकरांची नाट्यसृष्टी हा समिक्षाग्रंथ नागभीड तालुक्यातील साहित्यरसिकांसाठी मैलाचा दगड ठरावा असाच आहे.(तालुका प्रतिनिधी)
तळोधीत भरणार सारस्वतांचा मेळा
By admin | Updated: December 11, 2014 23:03 IST