चंद्रपूर : येथील ऐतिहासिक रामाळा तलावातील पाणी प्लास्टिक पन्नीमुळे दूषित झाले असून यावर उपाययोजना करण्याची मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे. अनेक भाविक या तलावाच्या पाण्यात पूजेचे सामान, गहू, तांदूळ आदी वस्तू प्लॅस्टिक पिशव्यात बंद करून टाकतात. कालांतराने हे सामान कुजुन सडते. त्यातून पाणी दूषित होते. तलावातील मासे या बंद पिशव्यात तोंड घालतात. त्यातच अडकून ते मृत पावतात. त्यामुळे मृत माशांचाही दुर्गंध येतो. यावर उपाययोजना म्हणून याठिकाणी महानगरपालिकेने निर्माल्य कलश ठेवावा व भाविकांना त्याच कलशात पूजेचे साहित्य टाकणे बंधनकारक केल्यास रामाळा तलावातील पाणी दूषित होणार नाही, असे मासेमार बांधवांचे म्हणणे आहे.यासंदर्भात यापूर्वी जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. तलावाच्या बाजुलाच रेल्वे साईडिंग असून याठिकाणी युरिया मोठ्या प्रमाणात उतरविला जातो. यादरम्यान सांडलेला युरिया नाल्याच्या सहाय्याने रामाळा तलावात येतो. त्यामुळेही पाण्याला दुर्गंधी येत आहे. या तलावात चार इंच हिरवागार थर तयार झाल्याने माशांना प्राणवायू मिळत नसल्याने त्या मृत होत आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक बंडू हजारे, जगन पचारे, लक्ष्मण तोकला, पांडूरंग गावतुरे, संतोष झा, देवराव मंचलावार, ेयांनी केली आहे. (प्रतिनिधी)
प्लास्टिक पन्नीमुळे रामाळा तलावाचे पाणी दूषित
By admin | Updated: December 18, 2015 01:17 IST