लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या जिल्हा तसेच आरोग्य प्रशासन कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत. अशातच आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे अन्य आजारही बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासगी डॉक्टरांनाही आता ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आदींचा आजार असलेल्या आणि ट्रॅव्हल्स हिस्ट्री असलेल्या प्रत्येक रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला द्यावी लागणार आहे.पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारणत: डेग्यू, मेंदूज्वर, मलेरिया, चिकनगुणिया, कावीळ, टायफाईड आदी आजार बळावण्याची शक्यता असते. या आजारांपैकी बहुतांश आजारांच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचा समावेश असतो. शिवाय हीच लक्षणे कोरोना या आजाराची आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना अशा प्रत्येक रुग्णांची नोंद घेत सदर रुग्णांची काही ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे काय किंवा तो कुठल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला काय, याची माहिती घेणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, तसे आढळल्यास त्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक आहे. तशा सूचनाही आरोग्य विभागाने जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांना दिल्या आहेत. या कामात खासगी डॉक्टरांनी हयगय केल्यास कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या पद्धतीने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली त्याच पद्धतीने पावसाळ्यात सुद्धा घेणे गरजेचे आहे.स्वच्छतेवर द्या अधिक भरपावसाळ्यामध्ये बहुतांशवेळा आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वत: आणि परिसराची नियमित स्वच्छता करणे गरजेणे आहे. डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा तर जलजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी स्वच्छ व निर्जंतूक पाणी प्यावे. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक व्यक्तीने पाणी उकळून थंड करूनच प्यावे, वैयक्तिक आणि परिसर स्वच्छता ठेवल्यास आजाराला दूर ठेवता येईल.मास्क वापरताना घ्या काळजीयावर्षी कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रत्येकांनी आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांनी पावसात भिजू नये, घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडावे. मास्क ओला झाल्यास काढून ठेवावा, यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असून कोरडा मास्कचा नागरिकांनी वापर करावा.पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारणत: विविध आजार तोंड बाहेर काढतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आरोग्यासंबंधी काळजी घ्यावी. वैयक्तिक आणि परिसराची स्वच्छता ठेवावी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडावे.- डॉ. निवृत्ती राठोडजिल्हा शल्य चिकित्कस, चंद्रपूर
पावसाळ्यामुळे वाढणार आरोग्य यंत्रणेवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST
पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारणत: डेग्यू, मेंदूज्वर, मलेरिया, चिकनगुणिया, कावीळ, टायफाईड आदी आजार बळावण्याची शक्यता असते. या आजारांपैकी बहुतांश आजारांच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचा समावेश असतो. शिवाय हीच लक्षणे कोरोना या आजाराची आहेत.
पावसाळ्यामुळे वाढणार आरोग्य यंत्रणेवर ताण
ठळक मुद्देकाळजी घ्या : खासगी डॉक्टरांना द्यावी लागेल माहिती