नागभीड तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून मंगळवारपर्यंत पावसाने दडी मारली होती. त्यामुळे रोवणी हंगाम खोळंबण्याच्या मार्गावर होता. अशा परिस्थितीत आकापूर येथील काही पंपधारक शेतकऱ्यांचा ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड आल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. अशा दुहेरी चक्रव्यूहात अडकल्याने रोवणी हंगाम उरकायचा कसा, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. या समस्येचे निकारण करण्याकरिता संबंधित पंपधारक शेतकऱ्यांनी सावरगाव येथील कनिष्ठ अभियंत्यांचे कार्यालय गाठले आणि समस्या मांडली. कनिष्ठ अभियंते बोंडे यांनी ताबडतोब कर्मचारी पाठवून ट्रान्सफाॅर्मर दुरुस्ती करवून घेण्यास सांगितले. लवकरच नवीन ट्रान्सफाॅर्मर बसविण्याची हमी दिली. यावेळी भाकरे, धनराज बावणकर, भोजराज नवघडे, माजी सरपंच वेंकय्या भाकरे, पंपधारक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
कोट :
काही शेतकऱ्यांचे मोटारपंप बिघडत आहेत. या बाबीला महावितरण कंपनी कारणीभूत आहे. जेवढा विद्युत पुरवठा पाहिजे तेवढा मिळत नाही. बिल नाही भरले की, तातडीने कनेक्शन बंद केले जाते. मात्र, विद्युतपुरवठा खंडित झाला, तर एकेक महिना तो बंद राहतो. याकडे कुणाचेही लक्ष जात नाही.
- वेंकय्या भाकरे, माजी सरपंच, आकापूर, ता. नागभीड