फोटो
प्रकाश काळे
गोवरी : शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटात भरडला जातो. शेतीवर केलेला खर्चही भरून निघत नाही. एवढी शेतीची अवस्था बिकट होत असतानाच, राजुरा तालुक्यातील पोवनी येथील युवा प्रगतिशील शेतकरी प्रफुल्ल बाबाराव कावळे(३२) यांनी आपल्या सहा एकर शेतात मिरचीची लागवड केली होती. मिरचीच्या आधुनिक पद्धतीने लागवड केलेल्या शेतीतून त्यांना चांगलेच विक्रमी उत्पादन मिळत आहे.
आजपर्यंत त्यांनी १०० क्विंटल मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले असून, त्यांना १५० क्विंटल मिरचीचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. निसर्गाची अवकृपा, नापिकी, कर्जबाजारी यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शेतीवर केलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची होरपळ सुरूच आहे. मात्र, राजुरा तालुक्यातील पोवनी येथील युवा प्रगतिशील शेतकरी प्रफुल्ल कावळे यांनी आपल्या सहा एकर शेतात तीन प्रकारच्या मिरचीची आधुनिक लागवड केली आहे. शेतकरी प्रफुल्ल बाबाराव कावळे यांची पोवनी गावालगत शेती आहे. या शेतात त्यांनी ६ एकर शेतात यंदा मिरचीचे पीक घेतले आहे. प्रारंभी मिरचीवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. मिरचीवर अतोनात खर्च केल्यानंतर कसेबसे पीक हाती येण्याची आशा पल्लवीत झाली. प्रफुल्ल कावळे यांचे शेताचे सभोवताल वेकोलीच्या कोळसा खाणींनी मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. या मातीच्या ढिगाऱ्यावर काटेरी झुडपे वाढल्याने वन्यप्राणी भरदिवसा शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात, परंतु हे सारे वन्यप्राण्यांचे उपद्व्याप सहन करीत प्रफुल्ल कावळे यांनी मोठ्या उमेदीने मिरचीची शेती केली आहे. त्यांनी आजपर्यंत १०० क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले असून, पुन्हा ५० क्विंटल मिरचीचे उत्पादन अपेक्षित आहे.
बॉक्स
नागपूर बाजारपेठेत मागणी
यंदा मिरची पिकाला नागपूर बाजारपेठेत १५ हजार रुपयांपर्यंत चांगला दर असल्याने, शेतकऱ्यांना बऱ्यापैकी नफा मिळण्याची शक्यता आहे. निसर्गाचा लहरीपणा, नापिकी, यामुळे शेतीवर अवकळा आल्याने शेतकरी कर्जबाजारी होतात, परंतु ६ एकर शेतात मिरचीचे विक्रमी उत्पादन घेऊन प्रफुल्ल कावळे या युवा शेतकऱ्याने शेती करणे सोडू पाहणाऱ्या हताश झालेल्या असंख्य शेतकऱ्यांना आशेचा नवा किरण दाखविला आहे.
कोट
निसर्गाची अवकृपा, शासनाचे शेतकरी विरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा येत आहे. नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी हताश न होता आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली, तर नक्कीच शेतीत भरघोस उत्पादन येईल. आजपर्यंत १०० क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले असून, पुन्हा ५० क्विंटलपर्यंत असे एकूण १५० क्विंटलपर्यंत मिरचीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे.
- प्रफुल्ल कावळे प्रगतिशील युवा शेतकरी, पोवनी