योजना ठरली कुचकामी : शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत वरोरा : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत लघु सिंचन विभागाच्या वतीने अल्पभुधारक शेतकऱ्यांना वरोरा तालुक्यातील विविध गावात सात सामूहिक शॅलो ट्युबवेल योजना मंजुर करण्यात आले. मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना मागील तीन वर्षांपासून आजतागत मिळाला नसल्याने २१ शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत लघु सिंचन विभागाच्या वतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे गट तयार करून सामूहिक शॅलो ट्युबवेल शेतात देण्यात येते. याकरिता विद्युत उभारणी ट्युबवेल पर्यंत सदर योजनेमध्ये करण्यात येते. सन २०१२ मध्ये वरोरा तालुक्यातील एकार्जुना, वनोजा, मार्डा, शेंबळ आदी गावामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचे गट तयार करून सात ट्युबवेल तयार करण्यात आल्यात. त्याकरिता विद्युत उभारणी करण्यात आली. परंतु त्याचे काम पूर्णत्वास गेले नसल्याने मागील तीन वर्षापासून या शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिके घेता आली नाही, सोबतच भाजीपालाही शेतात लावण्याकरिता पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक प्रतवारी सुधारावी याकरिता शासन शेती विकासाकरिता अनेक योजना कार्यान्वित करते. मात्र काही योजना शेतकऱ्यापर्यंत अर्धवट स्वरूपात पोहोचत असल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक प्रतवारी खरेच सुधारेल काय, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. (तालुका प्रतिनिधी)आंदोलनाचा इशारामागील तीन वर्षांपासून वरोरा तालुक्यातील २१ शेतकऱ्यांना शॅलो ट्युबवेलचा लाभ मिळाला नसल्याने अल्पभुधारक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. या योजनेचे काम पूर्ण दाखवून रक्कम उचल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे वरोरा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक छोटू शेख यांनी केला आहे. यामध्ये झालेल्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारण्याचा इशारा नगरसेवक शेख यांनी दिला आहे.
‘पावला’ म्हणायचा
By admin | Updated: April 9, 2016 01:18 IST