स्वस्त धान्यही नाही : घरकुलाच्या यादीमध्ये श्रीमंतांची नावेविनेदचंद्र मांडवकर नंदोरीनिराधार व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने घरकूल योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला मजबुत घर मिळेल, हा उद्देश होता. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या दुुर्लक्षितपणामुळे अनेकांना हक्काच्या घरापासून वंचित रहावे लागत आहे. येथील साधूजी उर्फ निलकंठ पांडुरंग जौंजाळ हा वयोवृध्द पडक्या घरात राहून शासनदरबारी घरकुलासाठी संघर्ष करीत आहे.नंदोरी येथील घरकुल योजनेच्या यादीमध्ये ९४ लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यापैकी काही खरोखरच लाभार्थी आहेत व काही बोगस व पुढाऱ्यांच्या मर्जीतील आहेत. काहीच्या नावे जमीन-जुमले आहेत. आठ ते दहा एकर शेतजमिनी स्वगावी व परगावी आहे. सातबाऱ्यावर जमिनीच्या नोंदीसुद्धा आहेत. काहींची आधीचीच भक्कम स्लॅबची घरे आहेत. अशांचाही घरकुलच्या यादीमध्ये समावेश आहे. याउलट योग्य लाभार्थीची नावे मात्र यादीमध्ये नाहीत. हे लाभार्थी मागील दहा ते बारा वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. भर पावसाळ्यात बिछाना गुंडाळून, तुटक्या खाटेवर बसून संबंध रात्र जागतात, पावसाने गळणाऱ्या जागी घरभर भांडे मांडतात, ज्यांच्या मोडकळीस आलेल्या घराला दारेसुद्धा नाहीत. उपजिविकेचे साधन असलेली दुभती म्हैस विकूनू घराची थोडीफार डागडुजी करीत अनेकजण घरकुलाची वाट पाहात बसले आहेत. येथील साधूजी उर्फ निलकंठ पांडुरंग जौंजाळ यांची तर व्यथाच वेगळी आहे. खरे लाभार्थी असतानाही ते मागील अनेक वर्षांपासून घरकुलच्या लाभापासून वंचित आहे. त्यांना साधे अन्न सुरक्षा योजनेतून सरकारी स्वस्त धान्य दुकानातून राशन मिळत नाही. दुसरीकडे बोगस लाभार्थी पुन्हा श्रीमंत होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य लाभार्थीची निवड करावी व शासनाची होणारी दिशाभूल थांबवावी, अशी मागणी या लाभार्थ्यांने ‘लोकमत’शी बोलताना केली. वंचित लाभार्थी साधूजी जौंजाळ म्हणतात, २६ जानेवारी २०१५ रोजी आमसभेतून त्यांचे नाव घरकुल यादीमध्ये व दारिद्र्य रेषा योजनेमध्ये सर्वानुमते ठराव घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. आमसभेच्या ठरावात गावाने आपली बाजू लावून धरली होती. या ठरावाने आपणास घरकुल मिळेल, आपण खरा लाभार्थी असल्याने, अधिकारी आपले दु:ख समजून घेईल, अशी आशा होती. पण आपले नाव घरकुल यादीतून व दारिद्र्यरेषेखालून वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आजही त्यांना पडक्या घरात, तुटक्या खाटेवर पावसात भिजत आयुष्य कंठावे लागत आहे. आपली व्यथा सांगताना जौंजाळ यांनी अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी बोगस लाभार्थ्यांची नावे घरकुल यादीत व दारिद्र्य रेषेखाली समाविष्ट केली. आपण खरा लाभार्थी असूनही आपले नाव योजनेत नाही. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व्हे केला. यातून आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप जौंजाळ यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून खऱ्या लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आहे.
घरकुलासाठी वृद्धाचा शासनदरबारी संघर्ष
By admin | Updated: October 1, 2015 01:20 IST