लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेळोवेळी सूचना व आदेश देत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना, नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल. आता सार्वजनिक ठिकाणी वावरताना मॉस्क वापरणे बंधनकारक आहे. अन्यथा दोनशे रुपये दंड आकारला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे.सोमवारी या संदर्भात जिल्ह्यातील नागरिकांना व्हिडीओ संदेश देताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचा शिरकाव होऊ नये, यासाठी अतिशय मर्यादित स्वरूपात तपासणी करून काही उद्योगांना सुरुवात करण्यात येत असल्याचे सांगितले. आजूबाजूला दोन जिल्हे कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे चंद्रपूरमध्ये येणाऱ्या नव्या कोणत्याही प्रवासाची तपासणी अनिवार्य आहे. अशा व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहे. जिल्ह्यात मर्यादित स्वरूपात मात्र केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत सिमेंट उद्योगाच्या काही कारखान्यांना सुरुवात करण्याची परवानगी दिली आहे.सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मॉस्क वापरणे अनिवार्य राहील. सदर व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याचे आढळून आल्यास त्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल आणि तीन मॉस्क देण्यात येणार आहे. दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात येणार आहे.सध्या जिल्ह्यामध्ये मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड आदी विविध भागातील मजूर मोठया प्रमाणात शेल्टर होममध्ये थांबले आहे. या सर्वांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ आहे. मात्र पुढील ३ मेपर्यंत शासनाने आंतर जिल्हा, आंतरराज्य, जाणे-येणे बंद केलेले आहे. त्यामुळे या मजुरांना राहणे व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.परंतु, या काळातदेखील त्यांना रोजगार मिळावा म्हणून स्थानिक ठिकाणी आवश्यक ते सामाजिक अंतर व सुरक्षितता पाळून काम देण्याचा प्रस्ताव शासनाने त्यांच्या पुढे ठेवला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये शासनाच्या शेल्टर होममध्ये ७९४ विविध बांधकाम ठेकेदाराकडे सहा हजार ३८६, गोसेखुर्दसारख्या मोठया प्रकल्पावर १२०३ अशा एकूण ८३८३ मजुरांची संख्या आहे. त्या ठिकाणी रोजगार देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.यांना करता येईल कारवाईउपरोक्त आदेशातील दंडात्मक व फौजदारी कारवाई पोलीस विभाग, संबधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत प्रशासनाला करता येणार आहे. तसेच दंड केलेल्या व्यक्तीस दंडाची कारवाई करणाऱ्या विभागाने तीन मॉस्क दयावे, असे स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन न करणाºया नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील १९३ प्रकरणात एकूण ११ लाख ३७ हजार ९७० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या ५८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर ७०१ वाहने जप्त केली आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.सोशल डिस्टंन्सिंग पाळासार्वजनिक ठिकाणे, कामाची ठिकाणे, वाहतुकीच्या ठिकाणांचे प्रभारी यांनी त्याठिकाणी सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग)े पालन होईल, याबाबत दक्षता घ्यावी. तसेच भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यानी दिल्या आहेत.गुटखा विक्री करणाºयांवर कारवाईसार्वजनिक ठिकाणी कोणत्याही संघटनेने, व्यवस्थापकाने दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्याच्या परवानगीला मज्जाव असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, गुटखा, तंबाखु यांची विक्री करणाºयावर सक्त कारवाईचे निर्देश दिले आहेत. उपरोक्त आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द दंडात्मक आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ४३ आणि भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८,२६९, २७०, २७१ नुसार कारवाई करण्यात येईल.
कोटा येथील मुलांच्या परतीसाठी प्रयत्नराजस्थान येथील कोटा या शहरात विविध अभ्यासक्रमासाठी गेलेल्या चंद्रपूर येथील मुलांना परत आणण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक लोकांनी विनंती केली आहे. जिल्हा प्रशासन या मुलांना परत आणण्याबाबत राज्य शासनाकडून परवानगी घेत आहे. यासंदर्भात अनेक मुलांसोबत जिल्हा प्रशासनाकडूनही संपर्क झालेला आहे. तथापि, कोटा येथून मुलांना परत आणताना चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मुलांना एकत्रित आणता यावे, यासाठी सर्व मुलांची यादी गोळा करणे सुरू आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.