चंद्रपूर : जिल्ह्यातील चिमूर, पोंभूर्णा आणि सावली या तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्याच्या घोषणेनंतर या तिन्ही ठिकाणच्या निवडणुकीसाठी नगर विकास मंत्रालयाने अधिसूचना जारी केल्यानंतर सोमवारी निवडणूक आयोगाने या ठिकाणच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या नुसार या तिन्ही ठिकाणी येत्या ६ नोव्हेंबरला निवडणुका होत आहेत. तर ७ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या सोबतच राज्यातील अन्य ठिकाणीही निवडणुका होत आहेत.चिमूर जिल्हा घोषित केला जावा आणि या शहराला जिल्हा मुख्यालयाचा दर्जा मिळावा अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. या मागणीसाठी शिवसेनेसह सर्वच पक्षांनी आंदोलने केली होती. दरम्यान चिमूरमध्ये झालेल्या एका समारंभात तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिमूरच्या ग्रामपंचायतीचे नगर पालिकेत रूपांतर करण्याची घोषणा केली होती. दरम्यानच्या काळात नव्या सरकारने राज्यातील तालुका मुख्यालय असलेल्या शहरांमधील ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रक्रियेत चिमूरसह सावली आणि पोंभूर्णाचही भाग्य उजळले आहे.चंद्रपूरलगतच्या घुग्घुस या औद्योगिक शहरातील ग्रामपंचायतीचे महानगर पालिकेत रूपांतर करण्याची आणि या शहराला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. मात्र यातील एकही मागणी पूर्ण न झाल्याने घुग्घुसकर जनता नाराज आहे.दरम्यान, नव्याने अस्तित्वात येणाऱ्या नगर पालिकांचे कार्यक्षेत्र, वॉर्ड याबद्दल पुरेसा तपशिल जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मात्र निवडणुका जाहीर झाल्याने आणि अधिसूचना निघाल्याने प्रशासनाची लगबग वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सबंधित अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
चिमूर, पोंभुर्णा, सावली नगरपालिकेची अधिसूचना जारी
By admin | Updated: September 29, 2015 02:32 IST