काँग्रेसचा आरोप : मालमत्ता करआकारणीच्या नव्या नोटीस नियमबाह्यचंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीतील एक हजार ४९७ भाडेकरू दुकानदारांनी लिजचे नुतनीकरण न केल्यास गाळे रिकामे करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. हा प्रकार गाळेधारकांमध्ये दहशत निर्माण करणारा असल्याची टीका काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष गजानन गावंडे गुरूजी यांनी केली आहे.महानगर पालिकेने मागील आठवड्यामध्ये चंद्रपूर शहरातील गाळेधारकांना नोटीस बजावण्याचे संकेत दिले होते. ज्या गाळेधारकांनी लिजचे नुतनीकरणे केले नसेल अशांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. या संदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यावर गाळेधारकांमध्ये बरीच खळबळ उडाली होती. दरम्यान, गाळेधारकांच्या एका शिष्ठमंडळाने माजी खासदार नरेश पुगलिया यांची भेट घेवून आपबिती मांडली. नगरपालिका अस्तित्वात असताना आणि पुढे महानगर पालिका अस्तित्वात आल्यावर अनेक गाळेधारकांनी आपसी समझोत्याने अथवा नाईलाजाने गाळे दुसऱ्यांना हस्तांतरित केले होते. त्या बदल्यात हस्तांतरण शुल्क म्हणून २५ हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत. बरेचदा व्यापाऱ्यांनी आर्थिक स्थिती वाईट असते, अथवा ज्याच्या नावे गाळा असेल त्याचा मृत्यू झाल्याने मुलांना गाळा हस्तांरित करण्याची प्रक्रिया झाली आहे. त्या बदल्यात मनपाने शुल्कही जमा करून घेतली असताना आयुक्तांनी असा निर्णय घेतल्याबद्दल गावंडे गुरूजी यांनी या पत्रातून आश्चर्य व्यक्त केले आहे.मालमत्ता कराच्या आकारणीसाठी आलेल्या नोटीसांवरही या पत्रातून आक्षेप घेण्यात आला आहे. महानगर पालिकेने मालमत्ता करात वाढ केल्यावर जनआंदोलन झाले होते. अखेर मनपाने आमसभेत निर्णय घेवून जुन्या दराने मालमत्ता कर घेण्याचे ठरविले होते. असे असतानाही नव्या दराने आकारणीच्या नोटीस आल्या आहेत. दबावतंत्राचा वापर करून जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व निर्णयांवर मनपा आयुक्तांनी फेरविचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा. असे न झाल्यास नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)गांधी शाळेच्या ‘त्या’ जागेवर स्वच्छतागृह उभारण्यास विरोधगांधी चौकालगत असलेल्या महात्मा गांधी प्राथमिक शाळेच्या सध्याच्या जागेवर स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भातील पत्र आयुक्तांनी काही नगरसेवकांना पाठविले आहे. मात्र यावर काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. ही शाळा ऐतिहासिक असून अनेक विद्यार्थी येथून घडले आहेत. या जागेभोवती दोन मंदीरे, पोलीस स्टेशन महानगर पालिकेची इमारत आणि बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतागृह न उभारता वाचनालय उभारावे अथवा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असा पर्याय ठेवण्यात आला आहे.
मनपाने १,४९७ भाडेकरू दुकानदारांना दिलेल्या नोटीस दहशतीसाठीच
By admin | Updated: September 13, 2016 00:42 IST