चंद्रपूर : देशाची अर्थव्यवस्था हा चिंतेचा नाही तर चिंतनाचा विषय झाला आहे. गरज काय आहे याची जाणीव ग्राहकांसह उत्पादकांनाही असायला हवी. आपली गरज लक्षात घेऊन खर्च केला तर कोरोनासारख्या संकटावरही मात करता येणे सहज शक्य आहे, असे विचार कुरुक्षेत्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा आवश्यकतावादी अर्थशास्त्र सिद्धान्ताचे जनक (नीडोनॉमिक्स) डाॅ. एम. एम. गोयल यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
येथील जनता महाविद्यालयात नॅक समितीचे सदस्य अध्यक्ष म्हणून आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत सेवानिवृत्त प्राध्यापक मोहम्मद अकबर खूर होते. भारतासह जगातील कोणत्याही देशातील आर्थिक व गैरआर्थिक समस्यांचे समाधान आवश्यकतावादी अर्थशास्त्रात आहे. यासोबतच हिंसा, आतंकवाद, शोषण, भेदभाव, असंतोष आणि समाजात पसरलेल्या भ्रष्टाचारासह अपेक्षा यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्यांवर ‘आवश्यकतावादी अर्थशास्त्र’ हे रामबाण उपाय आहे, असेही डाॅ. गाेयल म्हणाले. या वेळी त्यांनी भगवत् गीतेतील उदाहरणे सांगितली.
जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीला कोणीही नाकारू शकत नाही. हे सर्वांनी स्वीकारणे गरजेचे आहे. नैतिक व्यवहारातून यावर मात करता येणे शक्य आहे. यासाठी उपभोक्ता, उत्पादक, व्यापारी तसेच सर्व निर्मातांसह सुविधांचा उपभोग करणाऱ्यांनी भौतिक गरजा पूर्ण करण्यापेक्षा नेमकी गरज पूर्ण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. बाजारात १० रुपयांची वस्तू आहे. आणि तीच वस्तू महागडीपण आहे. केवळ ब्रॅण्ड व्हॅल्यू लक्षात घेऊन महागडी वस्तू खरेदी करण्यावर भर दिला जातो. परंतु ती वस्तू आणि तिची किंमत यामध्ये ताळमेळ बसतो काय, हे ती वस्तू खरेदी करताना विचारात घेणे म्हणजेच आवश्यकतावादी अर्थशास्त्र आहे. हे जेव्हा समजेल तेव्हा भारतच नव्हेतर, जगातील सर्व देशांना आर्थिक मंदीवर मात करून आपली अर्थव्यवस्था सुरळीत करता येणे शक्य आहे, याकडे डाॅ. गोयल यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. एम. सुभाष, डाॅ. एन. आर. बेग, डाॅ. अनिता हुडा, डाॅ. इम्यनुएल कोंड्रा, प्रा. रवी वरारकर उपस्थित होते.