परीक्षा केंद्र रद्द करा : बीआरएसपीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदांसाठी सरळ सेवा भरती नागपूर आयुक्त विभागाद्वारे घेण्यात येत आहे. यासाठी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले. मात्र त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे मुंबई, ठाणे देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे सदर परीक्षा केंद्र रद्द करुन नागपूर विभागातंर्गत येणाऱ्या जिल्ह्यात देण्यात यावे, अशी मागणी बीआरएसपीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. पुरवठा निरिक्षक पदांसाठी आयुक्त नागपूर विभाग नागपूर याद्वारे २३ जुलै रविवारी परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी विदर्भातील अनेक युवकांनी अर्ज सादर केले आहे. तसेच २२ जुलैला जिल्हा पातळीवर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठीसुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी पुरवठा निरिक्षक पदाचा पेपर मुंबईला असल्यामुळे एवढ्या कमी वेळात मुंबईला पोहचू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत, असे बीआरएसपीचे राजू झोडे यांनी म्हटले. यावेळी संपत कोरडे, प्रविण जमगे, पराग उराडे, प्रणय जांभुळकर, अश्विन उराडे, प्रमोद भटवलकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांची अडचण वाढलीमुंबईला परीक्षा केंद्र असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सदर परीक्षा केंद्र रद्द करण्याची मागणी बहुजन रिपब्लिकन सोशाल्सिट पार्टीच्या वतीने करण्यात आली. नागपूर विभागाद्वारे भरती प्रक्रिया राबवून परीक्षा केंद्र मुंबई दिल्यामुळे विद्यार्थ्यांची गोची झाली असल्याने विद्यार्थ्यांत रोष पसरला आहे. त्यामुळे परीक्षा रद्दची मागणी आहे.
नागपूर विभागाचे परीक्षा केंद्र मुंबईला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:43 IST