मासिक सभेत ठराव : शासनाने दखल घेण्याची मागणीनागभीड : नागभीड नगरपरिषद होत नसेल तर किमान नगरपंचायत तरी स्थापन करावी आणि नागभीडचा विकास साधावा, या मताशी नागभीड पंचायत समिती अनुकूल असून तसा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला आहे.शासनाच्या एका धोरणात्मक निर्णयानुसार राज्यातील तालुका स्तरावरील ग्रामंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुकास्थळे नगरपंचायती बनल्या असून अपवाद फक्त नागभीड ग्रामपंचायत ठरली आहे. याला कारण येथील आ. बंटी भांगडिया यांचा पूर्ण कल नगरपरिषदेकडे असला तरी, नगरपरिषदेसाठी पुरेशी लोकसंख्या जुळत नसल्याने नगरपरिषदेचे घोडे अडून आहेत.नगरपरिषदेसाठी किमान २५ हजार लोकसंख्येची अट आहे. ही लोकसंख्या नागभीड पूर्ण करु शकत नाही आणि म्हणूनच नवखळा, बामणी, डोंगरगाव, चिखलपरसोडी, त्रिकेश्वर, तुकूम, तिव्हर्ला ही गावे समाविष्ट करुन घेण्याचा पर्याय समोर आला. तशी तयारीही करण्यात आली. पण नंतर आमची गावे नागभीड नगरपरिषदेत समाविष्ट झाली तर भविष्यात अनेक त्रासांना सामोरे जावे लागेल, या निमित्त्याने यातील काही गावांनी नगरपरिषदेत समाविष्ट होण्यास नकार दिला. त्यामुळे नागभीड नगरपरिषदेचे भविष्य आज तरी अंधातरीच दिसत आहे. म्हणूनच नगरपरिषदेला पर्याय म्हणून नगरपंचायतीची मागणी करुन तिची स्थापना करण्यास काय हरकत आहे, अशा प्रतिक्रिया यासंदर्भात व्यक्त होत आहेत. नागभीड येथे नगरपंचायतीची स्थापनेचा पर्याय निघाल्यास या नगर पंचायतीमध्ये नवखळा, सुलेझरी आणि भिकेश्वर या गावांना समाविष्ठ करुन घेण्यास काहीच हरकत नाही. कारण ही गावे आता अलग अलग राहीलेच नाही तर एकमेकांना जुळून गेली आहेत. या गावांची मिळून एक सर्वांग सुंदर नगर पंचायत होऊ शकते. नागभीड पंचायत समितीने घेतलेल्या ठरावात केवळ नागभीडचाच उल्लेख केला असला ती नवखळा, सुलेझरी आणि भिकेश्वर या गावांनाही समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय झाला तर नागभीड पंचायत समितीने ने आडकाठी आणून नये. सद्यस्थितीत नगर विकास मंत्रालयाकडून नगरपचायतींना निधी जे वितरण केले आहे ते लक्षणीय आहे. नागभीडलाही विकासासाठी असे अनुदान हवे. (तालुका प्रतिनिधी)
नागभीड पं.स. चे नगरपंचायतीला समर्थन
By admin | Updated: March 11, 2016 01:41 IST