चंद्रपूर : येथील वनविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी मागील चार दिवसांपासून साखळी उपोषण व आंदोलन करीत आहे मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.वनविद्या पदवीधारकांना वनसेवेत एसीएफ, आरएफओ या पदासाठी १०० टक्के आरक्षण द्यावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र वनविद्या पदवीधारकांना शासनाकडून या पदासाठी डावलले जात असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. वनविद्या पदवीधारकांना एसीएफओ व आरएफओ या पदासाठी केरळ, तामिलनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिर, उडीसा आणि गुजरात या राज्यात आरक्षण लागू आहे. मात्र महाराष्ट्रात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून या मागणीकडे लक्ष वेधले आहे. वनविद्या विद्यार्थी संघटनेकडून काढलेल्या मोर्च्यात चंद्रपूर येथील वनविद्या महाविद्यालयाच्या बहुसंख्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. मागणीची दखल न घेतल्यास आणखी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वनविद्या पदवीधारकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By admin | Updated: January 16, 2016 01:16 IST