: अडवणुकीच्या धोरणाने नागरिक त्रस्त
आवाळपूर : कोरपना तहसीलदार व पुरवठा विभागाच्या बेजबाबदार व अडवणुकीच्या भूमिकेमुळे अनेक गोरगरीब कुटुंबांना मागील वर्षभरापासून अन्नधान्यापासून वंचित राहावे लागले आहे.
१८ मार्च २०२१ रोजी राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची पहिली बैठक होणार असून या बैठकीत सर्व पात्र गोरगरीब कुटुंबांच्या शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची मागणी नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य अभय मुणोत यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे केली आहे. अनेक कुटुंबांना अनेकदा अर्ज करूनही धान्य मिळत नसल्याची माहिती काही गरीब कुटुंबांनी दिली. गोरगरीब कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात नेमका घोळ का होतोय, याबाबत पुरवठा विभागाकडून माहिती घेतली असता तहसीलदार यांनी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यापूर्वी जाहीरनामा लावावा व पुरवठा निरीक्षकांनी शिधापत्रिकाधारकांच्या घरोघरी जाऊन तपासणी करून अहवाल सादर करावा. त्यानंतरच, पात्र कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश दिले असल्याने अनेक गोरगरीब कुटुंबांना हक्काच्या धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुका वगळता इतर तालुक्यांत जाहीरनामा लावण्याचा व घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्याचा कुठलाही आदेश नाही. कोरपना तालुका अतिदुर्गम व आदिवासीबहुल असल्यानेच अधिका-यांनी अटीशर्ती लावल्याचे दिसते.
कोट
तालुक्यातील सर्व पात्र गोरगरीब कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करावे, अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांना केली असून दक्षता समितीच्या बैठकीत तालुक्यातील पुरवठा विभागाच्या इतरही समस्या मार्गी लागतील, अशी आशा आहे.
-अभय मुनोत,
सदस्य ग्रामपंचायत, नांदा