जिवती: तालुक्यात सध्या आठवडाभरापासून मलेरिया आजाराने थैमान घातले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णत: कुचकामी ठरली आहे. तालुक्यापासून १२ किमी अंतरावर असलेल्या देशमुखगुडा येथील अंजना शिवशंकर दुधभाते (१३) या विद्यार्थीनीचा मलेरियाने मृत्यू झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. ही मुलगी हिमायतनगर जिल्हा परिषद शाळेतील सातव्या वर्गाची विद्यार्थिनी होती.जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नगराळा, जोळणघाट, मांगगुडा, तर पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कोलांडी, टिटवी, खडकी, रायपूर, आंबेझरी, नंदप्पा या गावात मलेरियाची साथ सुरू झाली आहे. तालुक्यात दोनच प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथेही डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. यामुळे तालुक्यातील अनेक रुग्ण गडचांदूर राजुरा तसेच चंद्रपूरला उपचारासाठी जात आहेत. पावसाळा सुरु होऊन दोन महिने लोटले. मात्र अनेक गावात फवारणी झाली नाही. यामुळे हिवतापाला आमंत्रण देणाऱ्या डासांचे प्रमाण वाढले आहे. ज्या देशमुखगुड्यात हिवतापाने अंजना मृत पावली, तेथे विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नाही. तसेच येथील पाण्याची चाचणीसुद्धा करण्यात आली नाही.(शहर प्रतिनिधी)सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा अपयशीतालुक्यात जिवती आणि पाटण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून याकेंद्रातंर्गत पुडियाल मोहदा, नगराळा, नोकेवाडा, लांबोरी, भारी, शेणगाव, नंदप्पा, हिरापूर आणि पुनागुडा येथे उपकेंद्र आहेत. परंतु याठिकाणी कर्मचारी वेळोवेळी उपस्थित न राहिल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. गावागावांत जाऊन कर्मचाऱ्यांनी भेटी द्यायला पाहिजे. पण असे होत नसल्याने आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. जिवती तालुका अनेक गावे आहेत. मात्र या तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाची सोय झाली नाही.तालुक्याला आता ग्रामीण रुग्णालय शासनाने मंजूर केले आहे पण ते सुरु होणार कधी? असा नागरिकांचा प्रश्न आहे.
देशमुखगुड्यात मलेरियाने विद्यार्थिनीचा मृत्यू
By admin | Updated: August 19, 2015 01:21 IST