दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : कोणत्याही शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना आपला माल विकण्याचे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. तसेच धानाचे पोते ठेवताना त्यात अंतर ठेवावे. धानाची मोजणी करण्यासाठी केंद्र शासनाची चमू आठ दिवसांत येणार होती. अद्यापही मोजणी करण्यासाठी केंद्र शासनाची चमू आली नाही. त्यामुळे साठवणूक केंद्र फुल्ल झाले आहेत. अनेक केंद्रांबाहेर ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या असल्याने शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागते.दरवर्षी शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता ऑनलाइन नोंदणी करावी लागत होती. या वर्षी मात्र कोणत्याही केंद्रावर कुठल्याही शेतकऱ्याला धान नेता येईल, असे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. तालुक्यात एकूण १० केंद्रे आहेत. कोठारांच्या क्षमतेत तफावत आहे. कोठारांत पोते ठेवताना दोन पोत्यांमध्ये अंतर ठेवावे. असे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. आठवडाभरात एक चमू पाहणी करण्याकरिता व मोजणी करण्याकरिता येणार होती. दीड महिन्याचा कालावधी लोटूनही केंद्र शासनाची चमू आली नाही. पोत्यांमध्ये अंतर ठेवल्याने उंचावर पोते चढविता येत नाही. त्यामुळे कोठारात जागा फुल्ल झाली आहे. पोते ठेवावे कुठे, असा प्रश्न केंद्रचालकांना पडला आहे. धानखरेदीकरिता शेतकरी अनेक केंद्रांवर ट्रॅक्टर घेऊन आले आहेत. मात्र, जागा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अनेक केंद्रांवर चकरा माराव्या लागत आहेत. केंद्रांच्या बाहेर धान भरलेल्या ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. आधीच हवामानामुळे अत्यंत कमी पीक झाले. दोन पैसे जास्त मिळतात म्हणून आधारभूत केंद्रांवर धान विकण्यासाठी शेतकरी आले आहेत. मात्र, ताटकळत राहावे लागत असल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.
त्या केंद्रावर मोजावे लागते भाडेयेथील कुर्झा वाॅर्डातील शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रावर कोठाराचा किराया म्हणून क्विंटलमागे २५ रुपये शेतक-यांकडून घेण्यात येत आहे. तर, काट्यापर्यंत धान नेणे, दुसऱ्या पोत्यात पलटविणे, याकरिता मजुरी घेण्यात येते.
दोन पोत्यांमध्ये अंतर ठेवल्याने उंचावर पोते चढविता येत नाही. त्यामुळे कोठारात जागा अधिक गुंतते. केंद्र शासनाची चमू आठवडाभरात पाहणी करण्यासाठी येणार होती. मात्र, अद्यापही चमू आली नाही. - प्रभाकर सेलोकर,मुक्त प्रशासक, कृ.उ.बा. समिती़,ब्रह्मपुरी