रानमेवा नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:27 AM2021-04-11T04:27:39+5:302021-04-11T04:27:39+5:30
सास्ती : शिशिर ऋतूच्या काळात पानगळ सुरू होऊन साऱ्या सृष्टीला एक प्रकारची मरगळ आल्याचा भास होतो. अशातच शिशिरानंतर वसंतऋतूचे ...
सास्ती : शिशिर ऋतूच्या काळात पानगळ सुरू होऊन साऱ्या सृष्टीला एक प्रकारची मरगळ आल्याचा भास होतो. अशातच शिशिरानंतर वसंतऋतूचे आगमन होते. झाडांना नवीन पालवी फुटू लागते. हा आनंददायी ऋतुबदल चैत्रात घडतो. याच कालावधी जंगलात टेंभरं, खिरण्या, चारबिया सारख्या विविध प्रकारचे निसर्गाचा गोडवा असलेली फळे पूर्वी बाजारात विक्रीला यायची. परंतु हायटेक जीवनमानामुळे या जंगली फळांची जागा मात्र आता विदेशी फळांनी घेतली आहे. त्यामुळे हा रानमेवा लुप्त होऊन भावी पिढीला याचा गोडवा चाखता येणे शक्य होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
चंद्रपूर जिल्हा हा निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. परिसरात निसर्गरम्य वातावरण असून येथील रानावनात बहुउपयोगी वनस्पती आहेत. विविध प्रकारच्या वनस्पतींसह रानातील रानमेवा असलेली विविध फळे या वनात आहेत. त्यात टेंभरे, चारबिया, खिरण्या, येरोन्या, काटबोरे, विलायती चिंचा, कवठ अशी विविध जंगली फळे आहेत. ही फळे बाजारात काही वर्षांपूर्वी विक्रीला राहत होती. ग्रामीण भागातील महिलांचा तो व्यवसाय असायचा. त्यातून मोठी मिळकतही होत होती. परंतु आज होणाऱ्या जंगलतोडीमुळे किंवा जंगलात जंगली जनावरांच्या वावर वाढल्यामुळे ही फळे बाजारात येणे कठीण झाले आहे. मोठ्या मेहनतीने ही फळे आणली तरी या फळांकडे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही. कारण आज बाजारात विदेशातील फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. हायटेक जीवनमानाच्या ओघात निसर्गाची देण असलेला रानमेवा दूर सारल्या जात आहे.
बॉक्स
पूर्वी शाळेसमोर लागायची दुकाने
पूर्वी शाळेसमोरही ही जंगली फळे विकल्या जात होती. शाळेतील मुले ही फळे मोठ्या आवडीने खात होती. परंतू आज या ठिकाणीसुद्धा फळांची जागा चॉकलेट व बिस्किटांनी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला निसर्गाची देण असलेल्या व गोडव्याने तृप्त करून टाकणाऱ्या फळे देणाऱ्या त्या जंगलाबद्दल आपुलकीही भावी पिढीपासून दूर जाताना दिसून येत आहे.
बॉक्स
औषधीयुक्त गुणधर्म
ही सर्व जंगली फळे मानवाच्या आरोग्यास उपयुक्त असून यात मोठ्या प्रमाणात ओषधीयुक्त गुणधर्म आहेत. या फळांद्वारे जीवनसत्त्वे तथा पोषणमूल्य मिळते. अशा या उपयुक्त वनस्पती नष्ट होताना दिसून येत आहेत. वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे जंगलांची तोड मोठ्या प्रमाणात होत असून या फळे देणाऱ्या वृक्षांचीही कत्तल होत आहे. तेंदूपत्ता संकलनात....... या टेंभराच्या झाडांची.......... पाने मोठ्या प्रमाणात तोडली जातात. त्यामुळे या झाडांची फळे दिसेनाशी झाली आहेत.