चंद्रपूृर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात डाटा एंट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या राज्यातील कंत्राटी डाटा एंट्री आॅपरेटर्सच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. सहसंचालकांच्या आदेशामुळे राज्यातील ७५ पैकी ४६ कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीला मुकण्याची पाळी येणार आहे. यात चंद्रपूर जिल्यातील सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एप्रिल-२०१५ मध्ये या कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आली होती. ११ महिन्यांनंतर म्हणजे मार्च-२०१६ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होत. मात्र अचानकपणे २५ सप्टेंबरला आरोग्य सहसंचालकांच्या कार्यालयातून आदेश आला. त्यात, सप्टेंबर-२०१५ पासून या कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्यावरील अन्यायासंदर्भात माहिती देण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील अन्याय मांडला. यासंदर्भात बोलताना निलेश सुभेदार म्हणाले, केवळ अल्प मानधनावर मागील अनेक वर्षांपासून राज्यातील डाटा एंट्री आॅपरेटर सेवा देत आहेत. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि पक्षघात (लकवा) या आजारांसाठी हे कर्मचारी काम करतात. विशेषत: ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेसाठी या कर्मचाऱ्यांनी मोलाची मदत सुरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यात २०१२ पासून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सुरू असून त्यात हे कर्मचारी सेवा देत आहेत. कंत्राटी आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करून सेवा देत असले तरी सरकारकडून अन्याय सुरु आहे. अनेक लोकोपयोगी योजना गुंडाळण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. सुसुत्रीकरण योजना राबविली जात असताना टप्पा क्रमांक एक मध्ये ही प्रक्रिया कोणत्या प्रकारे पूर्ण करण्यात आली याची माहिती देण्यात आलेली नाही. कर्माऱ्यांवर अतिरिक्त भार देण्यात आला असून कामाचा व्यापही वाढविला आहे. नवीन होणाऱ्या पदभरतीमध्ये या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आपल्यावरील अन्यायाला दाद मागण्यासाठी वित्तमंत्र्यांची भेट घेणार असून या विरोधात आंदोलन उभारले जाईल, आणि न्यायालयात दाद मागितली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला रामेश्वर बारसागडे, कुंदन देवईकर, देवेंद्र पिंपळकवर, श्वेता कंचर्लावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
डाटा एंट्री आॅपरेटर्सच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड
By admin | Updated: August 28, 2015 01:20 IST