मूल : येथील गोंडी विहीरगाव - ताडाळा वनसंरक्षित कक्ष क्र. ५५३ मध्ये बांबूची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या बांबूच्या झाडांना जेसीबीने तोडून आतमध्ये ढकलण्यात आली आहेत. त्यामुळे वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.दिवसेंदिवस वृक्षाची अवैध वृक्षतोड होत असल्याने वनाचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे यायला लागली आहेत. परिणामी मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्रात ताडाळा-गोंडी विहीरगाव येथे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. तसेच खनिज संपत्तीसुद्धा आहे. वनविभागाने जातीने लक्ष घालून वनसंपत्तीचे संरक्षण करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याच परिक्षेत्रात मुरूमाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. मात्र वनविभागाच्या आशिर्वादाने वनसंपदा व वनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होताना दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)
जेसीबीने तोडली बांबूची झाडे वन विभागाचे दुर्लक्ष
By admin | Updated: February 19, 2015 00:42 IST