देवाडा (खुर्द) : देवाडा खुर्द गावामध्ये मागील दोन महिन्यांपासून अनियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार माहिती देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे. त्यामुळे गावात संतापाचे वातावरण आहे. देवाडा खुर्द गावाला अंधारी नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी पाण्याची भुजल पातळी खोलवर असल्याने एप्रिल महिन्यापासूनच हँडपंप व विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. गावात पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी नागरिक शेतशिवारात असलेल्या विहिरी व तलावातील पाणी बैलबंडीने आणून तहान भागवीत होते. त्यानंतर याठिकाणी होणार्या नेहमीच्या पाणी समस्येला वैतागून स्थानिक नेते मंडळींनी येथील पाणी समस्या दूर करण्यासाठी तत्कालीन मंत्री स्वर्गीय वामनराव गड्डमवार यांच्याकडे समस्या मांडली. त्यांनी दखल घेऊन या ठिकाणी पाण्याच्या टाकीला मंजुरी दिली. त्या अनुषंगाने २४ एप्रिल १९८९ मध्ये ७५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले.त्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले. आजमितीस या टाकीला १५ वर्षपूर्ण झाले आहे. ज्यावेळी पाण्याची टाकी अस्तित्वात आली त्यावेळी कनेक्शनधारक केवळ ५० ते ६० होते. परंतु हळूहळू वाढीव लोकसंख्येमुळे सदर कनेक्शनधारकांमध्ये वाढ होवून आज २६० कनेक्शनधारक झाले झाल्याने नागरिकांना पाण्याचा पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे. त्यातच ग्रामपंचायत प्रशासनाकडून मागील दोन महिन्यापासून येथील नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे. याचा सर्वात जास्त फटका येथील वॉर्ड क्रमांक १ मधील नागरिकांना बसत आहे. याठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत असलेला गेट वॉल लिकेज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संपूर्ण पाणी उतार भागाकडे जात असल्याने वॉर्ड क्रमांक १ मधील नागरिकांना एक गुंडसुद्धा पाणी मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संबंधित प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदाधिकार्यांचा कर्मचार्यांवर वचक नसल्याने सदर प्रकार घडत असल्याचा आरोप अनिल देऊरमल्ले यांच्यासह नागरिकांनी केला आहे. पदाधिकार्यांच्या दुर्लक्षामुळेच गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतातून काम करून आल्यानंतर दुपारी उन्हात महिलांना वनवन भटकून पाणी आणावे लागत आहे. नवीन योजने त्वरित सुरु करून गावात पाण्याची होणारी नेहमीची अनियमितता दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
ंदेवाडा खुर्द येथे अनियमित पाणीपुरवठा
By admin | Updated: May 27, 2014 00:45 IST