ब्रह्मपुरी : शेतात विहीर असतानाही भारनियमन आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी वीज डिपी जळणे यासारखे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. खरीपाचा हंगाम फारसा समाधानकारक ठरला नाही. परंतु येणाऱ्या रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांना आशा आहे. पण विद्युत पुरवठ्यामध्ये सुधारणा होणे व भारनियमनांचे वेळापत्रक बदलविणे आवश्यक असल्याचे तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.यावर्षी सुरुवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांच्या नशिबाशी खेळ सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. जून महिन्यात येणाऱ्या मान्सूनचे राज्यात यंदा तब्बल दोन महिने उशीरा आगमन झाले. मात्र त्यानंतर परतीच्या पावसानेही हजेरी लावली नाही. परतीच्या पावसाने दिलासा मिळेल, असे वाटत होते. मात्र परतीचा पाऊसही हुलकावणी देऊन गेला. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम काही प्रमाणात हातातून निघून गेला. दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने विहिरी, तळे आणि सिंचन तलावात साचलेल्या पाण्याच्या आधारे रबीचा हंगाम घेण्याकडे शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र, रबीच्या नियोजनात आता वीज वितरण कंपनीने खोडा घातला आहे. कृषीपंपधारक शेतकऱ्यांना अवाढव्य वीज बिल आकारले जात आहे. याचा भरणा नियमित होत नसल्याने कृषीपंपाला देण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यात मोठ्या प्रमाणता कपात करण्यात आली आहे. भारनियमनातही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत काही ठिकाणी आठ ते १० तास भारनियमन होत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)
अनियमित वीज पुरवठ्याने शेतीला मिळेना पाणी !
By admin | Updated: November 12, 2014 22:41 IST