सीमेवरील विद्यार्थ्यांची व्यथा : एसटी महामंडळाची बसफेरीच नाहीलोकमत न्यूज नेटवर्कजिवती : राज्य सरकार शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु अनेक दुर्गम भागातील शिक्षणाची स्थिती पाहिली तर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. जिवती तालुक्यातील महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त गावातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरचा प्रवास पायदळ करावा लागत आहे. येण्या-जाण्याच्या साधनाअभावी अनेकवेळा त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील सीमावर्ती भागातील १४ गावे वादग्रस्तच ठरली आहेत. येथे दोन्ही राज्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. पण शिक्षणाची एक ते चार ही प्राथमिक सुविधा वगळली तर पुढचे शिक्षण घेण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर कोणताही पर्याय नाही. येथील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षापासून तेलंगणा राज्यात तेलगु शिक्षण घेताना दिसत होते. पण दोन-चार वर्षापासून हे सर्व विद्यार्थी मराठी शाळेत प्रवेश घेत आहेत. तालुक्यातील अनेक शाळेत तेलगु शाळेतून विद्यार्थ्यांचा प्रवाह वाहताना दिसतो आहे. मात्र वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. सीमेवरील विद्यार्थ्यांसाठी महामंडळाने सकाळ- संध्याकाळ बसेस सोडल्या तर विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर होईल.सीमेवरील गावे वादग्रस्त असली तरी आम्हाला महाराष्ट्र राज्य आणि मराठी शाळा याबद्दल खूप अभिमान आहे. परंतु महाराष्ट्र सरकारच्या महामंडळाच्या बसेस गावात येत नसल्याने नाईलाजास्तव तेलंगणात शिकावे लागत होते, असे येथील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत्’ाशी बोलताना सांगितले.आजही येथील अनेक विद्यार्थी बसेसअभावी पायदळ शाळेत जातात, तर २५ किमी अंतर खाजगी आॅटोत जीवघेणा प्रवास करुन जिवतीला शिकायला येतात.शासनाने विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशन योजनेच्या बसेस सुरु केल्या आहेत. पण या भागात या योजनेच्या बसेस पोहचल्याच नाहीत. सीमेवर १४ गावे असली तरी या गावात महामंडळाच्या बसेसच धावत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले. सोबतच सर्वसामान्य नागरिकांचेही हाल होत आहे.महामंडळाने किमान दोनदा बस सोडावीसीमावर्ती परमडोली, मुकदमगुडा, कोटा, शंकरलोधी येथील अनेक विद्यार्थी जिवती, नोकेवाडा, दमपूर मोहदा येथे पायदळ तसेच आॅटोने जाऊन शिक्षण घेतात. परंतु महामंडळाची बसेस या गावात येत नाही. सकाळी ११ वाजताची बस येते. त्यानंतर बसेस येत नाही. सायंकाळला पाच वाजता तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सकाळी सात- आठ वाजता बसफेरी उपलब्ध करावी, अशी मागणी या सीमावर्ती गावातील नागरिकांनी केली आहे.
विद्यार्थ्यांचा दररोज पायदळ प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:41 IST