सुधीर मुनगंटीवार : भद्रावतीत माणूसकीच्या भिंतींचे उद्घाटनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वत:चे पोट भरणे प्रकृती आहे. दुसऱ्याचे ओरबडून घेणे विकृती आहे. तर स्वत:च्या सोबत इतरांची काळजी घेणे ही संस्कृती आहे. भारताची सभ्यता त्यागाची आणि दानाची असल्याने टिकून आहे. विवेकानंद महाविद्यालयात सुरु करण्यात आलेली माणूसकीची भिंत त्यागाचे प्रतिक असून ही श्रृंखला जिल्हाभर वाढवावी, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तसेच विवेकानंद विद्यालयात ठेवण्यात आलेल्या वॉटर कुलरचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने माणूसकीच्या भिंतींच्या उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उदघाटक म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, आमदार बाळू धानोरकर, बळवंत गुंडावार, जिल्हा परिषद सभापती अर्चना जीवतोडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष युवराज धानोरकर, प्राचार्य एम. उमाटे, सुनिता खंडारकर, तहसीलदार सचिन कुमावत, मुख्याधिकारी विनोद जाधव, कार्यक्रमाचे समन्वयक अविनाश सिधमशेट्टीवार आदींची उपस्थिती होती.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, आपल्याकडे जे अधिक आहे. ते या भिंतीवर आणून ठेवणे आणि ज्यांना आवश्यकता आहे, त्यांनी ते घेऊन जाणे हीच आपली संस्कृती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भिंतीजवळ स्वत:जवळ असणाऱ्या अधिकच्या वस्तू ठेवल्या जातील व ज्याला गरज असेल तो ते घेऊन जाईल. देणाऱ्यांना ना अभिमान, ना घेणाऱ्यांना कमीपणा, अशी ही माणूसकी आहे. आपल्या सारख्याच दिनदुबळा असणाऱ्या समाजाला आपण मदत करणे, ही नैसर्गिक प्रवृती आहे. आणि सुदैवाने आपल्या संस्कृतीमध्ये या लोकांची संख्या अधिक असून याची एक श्रृखंला तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे भद्रावतीमधील ही भिंत या शहरापूरतीच मर्यादित न राहता जिल्हाभरात ही मोहिम पुढे गेली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी केली. आ. धानोरकर यांना दिलेले वचन पूर्ण झाले असून चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कुठल्याही चांगल्या कामांना कायम पाठींबा राहील. नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी नगराच्या संदर्भातील प्रस्ताव आणावे. आपण त्याला मंजूरी देवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.त्रिसुत्रीवर कामचंद्रपूर जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून समतोल विकासाची माझी निती असून हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्हा म्हणून मला पुढे न्यायचा आहे. त्यासाठीच आरोग्य, शिक्षण, रोजगार या त्रिसुत्रीवर लक्ष केंद्रित केले असून जनतेने गावागावात एकत्रित येवून विकासासाठी आग्रही राहावे, असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले.
त्याग आणि दानाची श्रृंखला जिल्हाभर वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:44 IST