फोटो-उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना
ब्रम्हपुरी : सप्टेंबर २०२० मध्ये पूर्व विदर्भातील गोसेखुर्द धरणाचे सर्वच दरवाजे खुले केल्याने भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील कास्तकारांचे फारच नुकसान झाले. शासनाने वेळीच दखल घेऊन पूरबुडीतांसाठी मदत जाहीर केली असून काहींना मिळाली तर काहींना अजूनही मिळालेली नाही.
पूर्व विदर्भातील पंचनामा झालेल्या पात्र शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी यासाठी कृती संसाधन समिती ब्रम्हपुरीद्वारा यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच उपविभागीय अधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी घर उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा दुसरा टप्पा त्वरित द्यावा, गरजू शेतकऱ्यांना बैलजोडी वाटप करावी, पट मान्यतेसाठी प्रयत्न करावे, पशुधन वाढ करणाऱ्या शेतकऱ्याला बक्षीस जाहीर करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. यावेळी यशवंतराव खोब्रागडे, ईश्वर जनबंधू , नामदेव आष्टेकर, गणपत शेंडे, नरेशचंद्र सहारे, ऋषी कावळे, भाऊराव मेश्राम, आनंद रामटेके उपस्थित होते.