कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, नागरिकांच्या दुर्लक्षामुळे बाधितांची संख्या वाढू लागली. नियमांचे उल्लंघन करून वाटेल त्या पद्धतीने फिरताना दिसत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त राजेश मोहिते यांच्या देखरेखीखाली तपासणी पथके तयार करण्यात आली. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रात दररोज तपासणी करणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले.
विवाह सोहळ्यासाठी ५० व्यक्तींचीच मर्यादा
लग्न व इतर तत्सम कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींची मर्यादा ठेवण्यात आली. इतर सभा, बैठका, सामूहिक समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमात बंदिस्त सभागृहात २५ टक्के अथवा १०० व्यक्तींपैकी कमी मर्यादा आहे. कार्यक्रमासाठी पोलीस विभागाची परवानगी बंधनकारक आहे.
सभागृह, मंगल कार्यालयावर निर्बंध
कोरोनाचे नियम न पाळल्यास सभागृह, मंगल कार्यालय, लॉन जागेचे मालक व व्यवस्थापकावर ५ हजार, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १० हजार व तिसऱ्यांदा २० हजार आणि कार्यक्रम आयोजकावरही १० हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दरम्यान, नायब तहसीलरांनी आज चंद्रपुरातील तुकूम मार्गावरील महेश भवन संचालकाकडून ५ हजाराचा दंड वसूल केला.