मनपा झाली, नाल्या तशाच : एमईएल प्रभाग पाण्यामुळे वैतागलाचंद्रपूर : स्मार्ट सिटीचे लोन सर्वत्र पसरलेयं. चंद्रपूरकरांनाही चंद्रपूर स्मार्ट सिटी झालेले हवंय. मात्र येथील अनेक प्रभागातील मूलभूत समस्याच अजून सुटू शकल्या नाहीत. एमईएल प्रभागात बहुप्रतीक्षेनंतर आता कुठे रस्ते होऊ लागले आहेत. मात्र इतर समस्या मनपा होऊन चार वर्ष होऊनही सुटल्या नाहीत. पिण्याचे पाणी, नाल्या आणि घरात शिरणारे नाल्यातील पाणी, यामुळे आम्ही पार वैतागलो आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली.चंद्रपुरातील प्रत्येक वॉर्ड स्मार्ट सिटीत यावा. तो वॉर्डही ‘स्मार्ट’ व्हावा, अशी चंद्रपुरातील प्रत्येक नागरिकांसोबतच ‘लोकमत’चीदेखील इच्छा आहे. मात्र यासाठी विकासाची गती कुठे आणि कितपत वाढवावी लागेल, याचा आढावा घेण्यासाठी लोकमतने प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे ठरविले आहे. सात हजार मतदार आणि सुमारे पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या येथील एमईएल प्रभागात ‘लोकमत चमू’ शनिवारी सकाळी दाखल झाली. यावेळी नागरिकांनी अत्यंत तळमळीने ‘लोकमत’जवळ आपल्या समस्या मांडल्या. नव्हेतर समस्यांचा पाढाच वाचला. एमईएल प्रभागातील संजयनगरमधील रेल्वे क्रासींगजवळ मोठ्या संख्येने नागरिकांची घरे आहेत. मात्र या ठिकाणी रस्ता सोडला तर उर्वरित सर्वच समस्या वर्षानुवर्षापासून जैसे थेच आहेत. या परिसरात सर्वात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकण्यात आली. ही पाईप लाईन आता अनेक ठिकाणी लिकेज झाली आहे. या लिकेजमध्ये चक्क नाल्यांचे पाणी शिरते. त्यामुळे नागरिकांच्या घरी भरमसाठ शुल्क भरूनही नळातून नालीतील काळे पाणी येते. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. या परिसरातील शालू बरडे या महिलेने सांगितले की आठवड्यातून केवळ दोनदा नळ येते. नाल्यांची सफाई तर महिनोमहिने केली जात नाही. त्यामुळे नाल्यांमधून दुर्गंधी येत असते. पंकज जवादे म्हणाले, नाल्यांची सफाई नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच परिसरातील कल्पना मिलिंद उराडे या महिलेने तर विजेबाबत चांगलाच रोष व्यक्त केला. वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे अनेक कामे प्रभावित होत असल्याचे त्या म्हणाल्या.एमईएल प्रभागात काही ठिकाणी रस्ते तयार करण्यात येत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न कायम असल्याचे जाणवले. काही ठिकाणी अजूनही कच्चे आणि खड्डेयुक्त रस्ते आहेत. या प्रभागातील सावित्रीबाई फुले चौकातही पाणी, नाल्या व काही ठिकाणी रस्त्यांची समस्या आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या या नाल्या आत्या मोडकडीस आल्या आहेत. लोकमत चमू प्रभागातील केरला कॉलनीत गेली, तेव्हा नागरिकांनी, विशेषत: महिलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या समस्या लोकमतजवळ मांडल्या. केरला कॉलनीत नाल्या तुटलेल्या आहेत, नाल्याची सफाईदेखील वर्षभर केली जात नाही, सार्वजनिक नळ नाही, हातपंप नाही, त्यामुळे पाण्याची समस्या नेहमीच जाणवते, पथदिवे नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य असते, मोठ्या नाल्याचे पाणी घरात शिरते, असा समस्यांचा पाढाच प्रिया फसादे, मंदा त्रिकोंडवार व आणखी दहाबारा महिलांनी लोकमतपुढे वाचला. (लोकमत चमू)
होयं...रस्ते होताहेत; इतर समस्यांचे काय ?
By admin | Updated: May 8, 2016 00:49 IST